महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत गडचिरोलीमध्ये कोटगुल ग्यारापत्ती-जंगल परिसरात ‘सी 60’ पोलीस पथकाने जहाल माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे याच्यासह 26 नक्षलींचा खात्मा केल्याने नक्षलवादी चळवळीला जबर तडाखा बसल्याचे मानले जात आहे. तेलतुंबडे याचे उपद्रवमूल्य पाहता महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे महत्त्व मोठे आहे. मागच्या काही वर्षांत पोलिसांनी विविध पातळय़ांवर घेतलेली आघाडी, नक्षली नेत्यांना टिपण्यात आलेले यश तसेच अनेक नक्षलवाद्यांनी धरलेली आत्मसमर्पणाची वाट आदी बाबींचा विचार करता नक्षलवाद्यांची सध्या विलक्षण ‘कोंडी’ झाली आहे, असे म्हणण्यास निश्चितच वाव आहे
दहशतवादाबरोबरच नक्षलवाद हेदेखील देशापुढील एक मोठे आव्हान मानले जाते. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेपुढील नक्षलवाद हे अत्यंत महाकाय आव्हान असल्याचे विधान केले होते. महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र, ओडिशाच्या जंगली पट्टय़ातील नक्षली कारवायांतून सातत्याने याची प्रचिती येते आहे. किंबहुना, आपले समांतर सत्ता चालविण्याचा प्रयत्न करणाऱया नक्षलवादापुढेही आजमितीला बरीच आव्हाने निर्माण झालेली दिसतात.
नक्षलवादाचा उगम
1967 मध्ये चारू मुजुमदार, कनू संन्याल व जंगल सथाल यांनी पश्चिम बंगालमधील नक्षलबारी या एका छोटय़ा खेडेगावात भूमिहिनांसाठी सशस्त्र उठाव केला. नक्षलवाद या शब्दाचा आणि एकूणच नक्षलवादी विचाराचा उगम येथूनच झाला, असे मानण्यात येते. चारू मुजुमदार यांच्या नेतृत्वाखालील चळवळीत अनेक ओढले गेले व हिंसक आंदोलनेही सुरू झाली. अर्थात आंदोलनाची धग ही पश्चिम बंगाल व आंध्र टापूत सर्वाधिक होती. 1972 ला चारू मुजुमदार यांना अटक झाली व अटकेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आंध्रातील डाव्या व लोकशाही व्यवस्थेस विरोध असणाऱया नेत्यांनी एकत्र येत पीपल्स वॉर ग्रुप स्थापन केला. कोंडापल्ली सीतारामय्या यांनी या चळवळीचे नेतृत्व स्वीकारत तिला आकार देण्याचे काम केले. त्यानंतर ही चळवळ अधिकाधिक उग्र बनत गेल्याचे पहायला मिळते.
दंडकारण्यात विस्तार
सीतारामय्या यांनी चळवळीच्या विस्तारासाठी व सुरक्षेसाठी पाच गट स्थापन केले व त्यांना गोदावरीच्या तटावरील जंगलामध्ये पाठविण्यात आले. हा परिसर म्हणजेच दंडकारण्य होय. बस्तर, आदिलाबाद, वारंगळ या जिल्हय़ांच्या सीमारेषेला लागून असलेल्या दंडकारण्यातूनच नक्षलवादी कारवायांचे संचालन केले जाते. बस्तर हा त्याचा केंद्रबिंदू असून, या जिल्हय़ाच्या सीमा महाराष्ट्र, आंध्र, मध्यप्रदेश, ओडिशा या राज्यांना लागून आहेत. आदिवासीबहुल अशा या भागात जंगलाचे प्रमाण भरपूर असल्याने हा दुर्गम टापू म्हणून ओळखला जातो. आदिवासी व गरिबांवर अन्याय होत असल्याकडे लक्ष वेधत नक्षलींनी या भागात आपली पाळेमुळे रुजविण्याचा प्रारंभी प्रयत्न केला. त्यानंतर अन्याय करणाऱया ठेकेदार व व्यापाऱयांना शासन केले. स्वस्त धान्य दुकाने लुटत आदिवासींना धान्यवाटप केले. बंदुकीच्या धाकाने तेंदूपान तोडणी व बांबू कापणी मजुरी वाढवत ‘रॉबिन हूड’ची प्रतिमा निर्माण करत लोकांचा विश्वास जिंकण्यात त्यांनी बऱयापैकी यश मिळविले. मात्र, आपली पकड व वलय तयार झाल्यावर हेच नक्षली आदिवासी बांधवांवरही दडपशाही करू लागले. खंडणी वसूल करू लागले. तर खबर दिल्याच्या संशयातून अनेक आदिवासींना नक्षलींना ठार केल्याची उदाहरणे सांगितली जातात.
भूसुरूंगाचे अस्त्र
80 च्या दशकात गडचिरोलीत नक्षलवादाने प्रवेश केला व बघता बघता तेथे हातपाय पसरले. त्यानंतर 1990 पासून पोलीस व माओवाद्यांमध्ये संघर्ष झडू लागला. 2000 पासून तर तो टिपेला पोहोचला, असे म्हणता येईल. गनिमा कावा, हे नक्षलींच्या रणनीतीचे प्रमुख वैशिष्टय़ असून, आयडी वा भूसुरूंग स्फोट घडविणे, हे त्यांचे प्रमुख अस्त्र आहे. आजपर्यंत याच अस्त्राचा ते चलाखीने उपयोग करीत असून, 70 टक्के जवानांचा मृत्यू हा अशा स्फोटातून झाल्याचा सीआरपीएफचा अहवाल सांगतो.
पोलीस दलाचा पलट‘वॉर’
मागील काही वर्षांत पोलीस दलानेही आक्रमक पवित्रा घेत नक्षलींविरोधात आघाडी घेतल्याचे चित्र पहायला मिळते. नक्षलींचे अनेक बडे नेते मारले जाणे, शरणागती पत्करणाऱया नक्षलींचे संख्या वाढणे, हे त्याचेच द्योतक होय. 2018 मधील पोलीस कारवाईत 40 माओवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले. तर मागील आठवडय़ातील कारवाईत मिलिंद तेलतुंबडेसह 26 नक्षलींचा खात्मा करण्याची झालेली कारवाई हे पोलीस दलाचे मोठे यश म्हणता येईल. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. यातून नक्षलींचे कंबरडेच मोडले असून, हा आक्रमक पवित्रा पोलीस दल असाच ठेवणार का, याबाबत औत्सुक्य असेल.
तेलतुंबडेवर अचूक ‘निशाणा’
नक्षलींचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडे याला ठार करीत पोलिसांनी अचूक नेम साधला आहे. नक्षलींच्या केंद्रीय समिती सदस्यपदासह महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड क्षेत्रीय समितीचा प्रमुख म्हणून कार्यरत असलेला तेलतुंबडे हा अत्यंत खतरनाक नक्षलवादी म्हणून ओळखला जात असे. 42 चकमकी, सात नागरिकांसह चार पोलिसांच्या हत्या तसेच जांभूळखेडा येथील 2019 मधील भूसुरूंग स्फोटाचाही तो सूत्रधार होता. जंगलातील माओवादी कारवायांची आखणी व अंमल, शहरी भागात माओवादाचा प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी नेटाने पार पाडणारा तेलतुंबडे बेरोजगार वा व्यवस्थेबद्दल असंतोष असलेल्या तरुण मुलांना हेरून त्यांना नक्षली चळवळीकडे ओढत असे. गडचिरोलीचा गोंदियालगतचा सीमावर्ती भाग, मध्यप्रदेशातील बालाघाट आणि आजूबाजूचे जिल्हे तसेच छत्तीसगडमधील राजनांदगाव हा नवा झोन तयार करण्याकरिताही तो प्रयत्नशील होता. महाराष्ट्र पोलिसांचे 50 लाखांचे, तर अन्य राज्यांचे दोन कोटीचे असे एकूण अडीच कोटींचे बक्षीस लावण्यात आले होते. माओवाद्यांनी जीवाचे रान करूनही तो वाचला नाही. त्याचे मारले जाणे, हा माओवाद्यांसाठी एक झटकाच असून, प्रतिशोधासाठी ते संधीच्या शोधात राहतील, अशी शक्यता आहे. अर्थात ही शक्यता गृहीत धरून पोलीस दलही सजग राहील, ही अपेक्षा आहेच.
डॉ. आनंद तेलतुंबडे कोण..?
मिलिंद तेलतुंबडे याचे भाऊ डॉ. आनंद तेलतुंबडे हेही एल्गार प्रकरणात आरोपी आहेत. ते सध्या अटकेत असून, त्यांच्या सुटकेसाठी मध्यंतरी काही संघटनांनी आंदोलनही केले होते. डॉ. आनंद हे वंचितचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांचे मेव्हणे आहेत. डाव्या चळवळीचे लेखक व विचारवंत म्हणूनही ओळख असलेले आनंद तेलतुंबडे आजारी असल्याचे सांगितले जाते. तर मिलिंद तेलतुंबडे याची पत्नी अँजेला सोनटक्के हिची 2016 मध्ये जामिनावर सुटका झाली असून, तिला चार जिल्हय़ात प्रवेशास बंदी आहे. तिच्या उपस्थितीतच यवतमाळमध्ये वणी येथे तेलतुंबडेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बडय़ा नक्षली नेत्यांचा खात्मा
तसे या आधीही अनेक नेते मारले गेले आहेत. 1999 मध्ये आंध्र पट्टय़ात नल्ला रेड्डी, सीलम नरेश, संतोष रेड्डी या नक्षल नेत्यांना ठार करण्यात आले होते. जुलै 2010 मध्ये पोलिसांसोबतच्या चकमकीत नक्षलवाद्यांचा प्रवक्ता चेराकुरी राजकुमार ऊर्फ आझाद हा मारला गेला. त्याच्या मृत्यूची तेव्हा मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर बडा नेता किशनजीचा खात्मा केला गेला. अलीकडच्या काळात साईनाथ, रंजिता, सिनू, रामको असे नक्षलींचे बडे नेते ठार झाले. जहाल नक्षलवादी भास्कर हिचामीला अलीकडेच म्हणजे मार्च 2021 मध्ये कंठस्नान घालण्यात यश आले.
सर्वोच्च नेता गणपतीचा ठावठिकाणा नाही
दुसरीकडे नक्षलींचा सर्वोच्च नेता मुप्पाला लक्ष्मण राव ऊर्फ गणपती, नंबाला केशवराज यांचा ठावठिकाणा शोधण्यात अद्याप यश आलेले नाही. 1992 पासून माओवादी चळवळीचे नेतृत्व करणाऱया गणपतीने प्रकृती अस्वास्थ्यामुळे नेतृत्वाची जबाबदारी 2018 ला नंबाला केशवराज ऊर्फ बसवराजूकडे सोपविली. त्यानंतर त्याने उपचाराकरिता फिलिपाईन्स देशाची वाट धरल्याची वदंता आहे. तर मागील वर्षी तो आत्मसमर्पण करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. सत्तरी पार केलेल्या गणपती याचा ऐन पस्तीशीतीलच फोटो आज रेकॉर्डवर उपलब्ध असल्याचे सांगितले जाते.
चळवळीला ओहोटी?
नक्षली चळवळीला आता आहोटी लागली की काय, असा सवालही उपस्थित होत आहे. आपली हिंसा वा बंदूक की अन्यायाविरोधात वा शोषणाविरोधात आहे, हे दाखवून देण्यात सुरुवातीच्या काळात नक्षलींना काही प्रमाणात यश आले. त्यामुळे त्यांना जंगलपट्टय़ात सहानुभूती मिळत होती. परंतु, पोलिसांना खबर दिल्याच्या संशयातून गरीब आदिवासींनाही त्यांनी लक्ष्य करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना मिळणार पाठिंबा हळूहळू आक्रसत गेला, असे तज्ञांचे मत आहे. ‘दोन दशकांपूर्वी चळवळीवर जेव्हा विचारसरणीचा प्रभाव होता, तेव्हा कोणालाही शिक्षा देताना दहादा विचार केला जाई. आता सर्रास गळा कापला जातो. दहशत कायम ठेवण्यासाठी नेमाने हत्या घडविल्या जातात,’ असे ज्येष्ठ पत्रकार व नक्षलवाद या विषयाचे अभ्यासक देवेंद्र गावंडे आपल्या पुस्तकात म्हणतात. तेव्हा वैचारिक मतभेद झाले, तरच आत्मसमर्पण करण्याचे धाडस चळवळीतील सदस्य दाखवित. आता अन्य कारणेही पुरेशी ठरत असल्याकडे ते लक्ष वेधतात. कमांडर सैनू, पहाडसिंह, गोपी यांच्यासह अनेक नक्षली नेत्यांनी व चळवळीतील सदस्यांनी मागच्या काही वर्षांत आत्मसमर्पण वा शरणागतीचा मार्ग स्वीकारला आहे. याशिवाय 2018 मध्ये गडचिरोलीतील नक्षली चळवळीचा आधारस्तंभ असलेल्या नर्मदाक्का हिला पतीसह अटक करण्यात आली. असे अनेक हादरे मागच्या काही वर्षांत या चळवळीला बसत आहेत. त्यात नैतिक पाठबळ व जनाधार गमावल्याने ही चळवळ आता कठीण परिस्थितीतून जात असल्याची मांडणी करण्यात येत आहे. स्वाभाविकच माओवाद्यांच्या अस्तित्वाची आता कसोटी लागणार, हे नक्की आहे.
विचाराऐवजी हिंसा, दडपशाहीचा मार्ग पत्करल्याने नक्षलवादी चळवळ भरकटत गेली. आदिवासींच्या हक्काचा घोष करणारे नक्षलीच आदिवासींचे बळी घेत असतील, तर ही चळवळ नेमकी कुणासाठी आहे, असे प्रश्न केले गेले. त्यातूनच या चळवळीचा जनाधार आक्रसू लागला. आज नक्षली चळवळीकरिता नवीन मुले उपलब्ध होत नसून, भरतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशी स्थिती दिसते. स्वाभाविकच चळवळ पुढे कशी न्यायची, हा प्रश्न गडद होऊ शकतो. ‘नक्षली गटांवर सशस्त्र लढय़ाचा त्याग करण्याचे दडपण केवळ पोलिसी बळातून येणार नाही. त्याकरिता शासन व्यवहार सुधारून भौतिक विकास साधावा लागेल. त्यातून नक्षलवाद्यांवरचा दबाव वाढेल. तसेच आमच्यासाठी लढता, तर अंदाधुंद हिंसा थांबवा, असे जनतेचे दडपणही नक्षलींवर असावे. त्यातून कदाचित क्रांतिकारक सर्वज्ञतेतून नक्षलवादी समूह बाहेर पडतील,’ असे राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी म्हटले आहे. सारांश भविष्यात आदिवासी भागात दळणवळणासह रोजगारनिर्मितीवरही भर द्यावा लागेल. शासकीय कार्यपद्धती सुधारावी लागेल. तसेच विकासाची फळेही दुर्गम भागापर्यंत पोहोचवावी लागतील. त्यातून खऱया अर्थाने नक्षलवादाचा शक्तिपात व निःपात करणे शक्य होणार आहे.
‘सलवा जुडूम’ अयशस्वी
बस्तरमधील आदिवासींच्या सलवा जुडूमसारख्या मोहिमेने नक्षली चळवळीला हादरा नक्कीच बसला. मात्र, ‘बंदुकीला बंदुकी’ने उत्तर देत उभा राहिलेला हा लोकलढा योग्य दिशेअभावी अपेक्षित ध्येय गाठू शकला नाही. सरकार व राजकारण्यांनी योग्य दिशा न दिल्याने तो अयशस्वी झाला. त्यांनी ती दाखविली असती, तर चित्र वेगळे असते, अशी मांडणी गावंडे यांनी केली आहे.
आर. आर. आबांचे बेसिक काम
आर. आर. पाटील यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून चोख जबाबदारी पार पाडताना अत्यंत बेसिक कामे केल्याचे पहायला मिळते. त्यांच्या काळात मोठय़ा प्रमाणात दळणवळण व पायाभूत विकासाची कामे झाली. पोलिसी ‘बळ’ वाढविणे व आत्मसमर्पण अशा दोन्ही आघाडय़ांवर त्यांच्या काळात भरीव काम झाल्याचे दृश्य परिणाम नंतरच्या काळात पहायला मिळाले. गृहमंत्री आर आर पाटील यांच्याकडे दूरदृष्टी होती. त्यांनी नक्षलींच्या मुलांच्या शाळेचीही सोय लावत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले.
नक्षली-पोलीस संघर्षाच्या काही ठळक घटना
@एप्रिल 2018 मध्ये भामरागड तसेच अहेरी तालुक्याच्या भागात झालेल्या चकमकीत पोलिसांकडून 40 नक्षलवाद्यांचा खात्मा
@ मे 2019 मध्ये जांभूळखेडा येथे माओवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात 15 जवान हुतात्मा
@ एप्रिल 2021 मध्ये छत्तीसगडमधील भीषण नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 22 जवान हुतात्मा
@ 13 नोव्हेंबर 2021 ला गडचिरोलीत नक्षली व सी 60 पोलिसांच्या धुमश्चक्रीत मिलिंद तेलतुंबडेसह 26 नक्षलींना कंठस्नान संकलन
प्रशांत चव्हाण, पुणे