रायपूर / वृत्तसंस्था
छत्तीसगडमधील विजापूर जिल्हय़ातील ताररेम येथे नक्षलवादी आणि सीआरपीएफ जवानांमध्ये चकमक उडाली. शनिवारी दुपारच्या सुमारास झालेल्या या चकमकीमध्ये पाच जवान हुतात्मा झाले असून दहा नक्षलवादी ठार झाले आहेत. चकमकीनंतर नक्षलींनी जंगलभागात पलायन केल्यानंतर घटनास्थळावरून मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या चकमकीनंतर परिसरात व्यापक शोधमोहीम हाती घेतली आहे. तसेच पोलीस महासंचालकांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठकही आयोजित केली.
विजापूर जिल्हय़ात सुरू असलेल्या नक्षलविरोधी मोहिमेमध्ये एसटीएफ, डीआरजी, सीआरपीएफ आणि कोब्रा पथकाचे 400 जवान सहभागी झाले होते. शोध मोहिमेदरम्यान नारायणपूर येथे जवानांच्या बसवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. दोन्ही बाजूने यावेळी तुफान गोळीबार झाला. यात दोन नक्षलवादी ठार झाले, तर पाच जवानांना वीरमरण आले. हुतात्मा झालेल्या जवानांमध्ये ‘डीआरजी’च्या 3 आणि सीआरपीएफच्या दोन जवानांचा समावेश आहे. तसेच अन्य 10 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती डीजीपी डी. एम. अवस्थी यांनी दिली आहे. हल्ल्याची माहिती मिळताच नऊ रुग्णवाहिका चकमकीच्या ठिकाणी दाखल झाल्या होत्या. तसेच दोन एमआय-17 हेलिकॉप्टर देखील घटनास्थळाकडे रवाना करण्यात आले आहेत, अशी माहिती सुरक्षा सूत्रांकडून देण्यात आली आहे. यापूर्वी 23 मार्च रोजी नारायणपूर जिह्यात नक्षलवाद्यांनी आयईडीद्वारे सुरक्षा दलाच्या बसवर हल्ला केला होता.
सुरक्षा जवानांवर नक्षलींकडून गोळीबार
पोलीस महासंचालक डी. एम. अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार नक्षलविरोधी कारवाईदरम्यान ही चकमक घडली आहे. ताररेम भागात सुरक्षा जवान आणि नक्षलवादी आमने-सामने आले. सर्वप्रथम नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्यानंतर जवानांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईनंतर दोन नक्षलींचे मृतदेह घटनास्थळी सापडले. त्यानंतर शोधमोहिमेवळी आणखी 8 मृतदेह सापडल्याने खात्मा झालेल्या नक्षलींचा आकडा 10 इतका झाला आहे. आणखीही काही नक्षलवादी ठार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सायंकाळी काळोखमय वातावरणामुळे मोहीम स्थगित करण्यात आली.
छत्तीसगडमध्ये तीन वर्षात 970 घटना
केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी फेब्रुवारीमध्ये संसदेत दिलेल्या माहितीनुसार, देशभरात नक्षली घटनांमध्ये घट झाली आहे. देशात 2018 मध्ये 833 तर 2019 मध्ये 670 आणि 2020 मध्ये 665 घटनांची नोंद झाली आहे. 2018 ते 2020 या तीन वर्षात छत्तीसगडमध्ये 970 नक्षली घटना झाल्या. यात 117 जवान हुतात्मा झाले आहेत. 2 फेब्रुवारी 2021 रोजी लोकसभेत या नक्षली हल्ल्यांची माहिती देण्यात आली होती. नक्षल प्रभावित परिसरात नक्षली हल्ल्यात घट झाल्याचा दावा केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी केला होता.