खासदार उदयनराजे भोसले यांची माहिती
प्रतिनिधी/ सातारा
सातारा नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकाम आराखडय़ास मंजुरी मिळाली असून राज्य आणि केंद्र शासनाकडून भरीव निधी प्राप्त करुन घेवून लवकरच नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकामाची पायाभरणीस सुरुवात केली जाईल. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातसुध्दा कोणत्याही नगरपरिषदेची अशी इमारत कुठेही नसेल इतकी वैभवशाली आठ मजली प्रशासकीय इमारत सातारा शहराचा मानबिंदू ठरणारी असेल, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, सातारा शहराची वाढती लोकसंख्या, झालेली हद्दवाढ, भविष्यातील नगरपरिषदेची होणारी महानगरपालिका, इत्यादींचा विचार करुन सुमारे दोन वर्षापूर्वी अत्याधुनिक सुविधांसह, कर्मचाऱयांची कार्यक्षमता वाढवणारी व्यवस्था असलेल्या प्रशासकीय इमारतीची संकल्पना सातारा विकास आघाडीने राबवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी बाबासाहेब कल्याणी यांची टाऊन हॉलसाठी असलेली आरक्षण जागा सुचविण्यात आली आहे. याबाबत पदमभुषण बाबासाहेब कल्याणी यांच्याशी आम्ही पुणे येथे प्राथमिक चर्चा केली असता पहिल्याच चर्चेत मनापासून उदार अंतःकरणाने त्यांनी यासाठी दुजोरा दिला.
सदरची जागा कोणत्याही पध्दतीने हस्तातरीत म्हणजेच बक्षिसपत्र, दानपत्र इत्यादी पध्दतीने केले असते तर नगरपरिषदेला सुमारे 26 लाख इतकी स्टॅम्प डयुटी भरावी लागणार होती. तथापि या जागेचे कन्सिडर हस्तांतरणमुल्य एक रुपया दाखवून, सुमारे 26 लाख रुपयांची स्टॅम्प डयुटीसुध्दा रितसर सुमारे 40 गुंटय़ांची कोटय़ावधीची मालमत्ता फक्त 1 रुपया नाममात्र मुल्याने खरेदी खताने नगरपरिषदेच्या मालकीची झाली. त्यामुळे नगरपरिषदेच्या तिजोरीत भरच पडली आहे.
या जागेवर राजधानी सातारा शहराचे लोकिकाला साजेसी इमारत होण्याकरीता प्रशासकीय इमारतीचा आराखडा, वास्तुविशारद (आर्किटेक्ट) यांच्याकडून तयार करुन घेण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील वास्तुविशारदांची खुली स्पर्धा आर्किटेक्ट असोशिएशनच्या माध्यमातुन भरवण्यात आली. या स्पर्धेतून पुण्याचे वास्तुविशारद भंडारे यांचा आराखडा स्वीकारला असून त्या आराखडयानुसार आज मंजूरी मिळाली आहे.
चौकट
इमारतीसाठी 60 कोटीच्या निधीची गरज
या आराखडयानुसार इमारती करीता सुमारे 60 कोटी पेक्षा जास्त रुपयांचा निधी लागणार असल्याचा अंदाज आहे. या आवश्यक खर्चाच्या निधीकरीता राज्य शासनाच्या वैशिष्टयपूर्ण नाविन्यपूर्ण विकासकामे या योजनेखाली निधी प्राप्त करुन घेतला जाणार आहे. तसेच केंद्र शासनाच्या अखत्यारितुन विशेष बाब म्हणून भरीव निधी प्राप्त करुन घेतला जाणार आहे. सातारकरांचा विकास साविआमध्ये सामावलेला आहे. म्हणूनच स्वप्नपूर्तीच नव्हे तर आश्वासन, वचनपूर्ती किंवा दिलेल्या शब्दाला जागल्याचे एक वेगळे समाधान असल्याची भावनाही खासदार उदयनराजेंनी व्यक्त केली आहे.