वार्ताहर / निपाणी :
विहिरी, तलाव, नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी गणेश मूर्तींचे विसर्जन न करता मूर्ती नगरपालिकेकडे जमा कराव्यात, या आवाहनाला प्रतिसाद देत बहुसंख्य गणेश भक्तांनी गणेशमूर्ती विसर्जित न करताना नगरपालिकेकडे सुपूर्द केल्या. पण या सुपूर्द करण्यात आलेल्या मूर्ती कचरा डेपोत ठेवून विटंबना झाल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. यामुळे निपाणीतील हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी संबंधित अधिकाऱयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गुरुवारी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना हिंदू संघटनांतर्फे कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना अमोल चेंडके म्हणाले, नगरपालिकेने गणेश मूर्ती कचरा डेपोत ठेवून विटंबना केल्याने तमाम हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. यापूर्वी कोरोना जागृतीचे निमित्त करून श्रीगणेश व यम यांची वेशभूषा करून भावना दुखावल्या आहेत. हिंदूच्या भावनांचा अनादर करताना देवदेवतांचा अवमान करणाऱया अधिकाऱयांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली.
यावेळी दिलेल्या निवेदनात गणेश मूर्ती विटंबनाची उच्चस्तरीय सखोल चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱयांचे निलंबन करावे. आतापर्यंत किती मूर्ती संकलित केल्या व पुढे त्या मूर्तींचे काय केले? याचा खुलासा करावा. यापुढे हिंदूंच्या कोणत्याही धार्मिक कार्यात सेक्यूलर प्रशासनाने ढवळा ढवळ करु नये, अशा मागण्या केल्या आहेत.
यावेळी राजेश आवटे, अभिनंदन भोसले, सागर श्रीखंडे, बबन निर्मळे, बसवराज कल्याणे, पृथ्वीराज मुसीभावे, आशुतोष साळुंखे, नवनाथ चव्हाण, राजू कोपार्डे, चंद्रशेखर साखरे, अजित पाटील, रुपेश तोडकर, शिवकुमार बोदले, सूरज जाधव यांच्यासह हिंदू संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.