प्रतिनिधी/ सातारा
जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळात कोणीही विरोधक नाही. बँकेत हा त्या पक्षाचा तो त्या पक्षाचा हे केले जात नाही. पक्ष विरहित बँक ठेवण्याचे पथ्य पाळले आहे. बँकेच्या सभेमध्ये कोणाला डावलले असे काही झाले नाही. निवडणूकीची प्रक्रिया कायदेशीर मार्गाने सुरु आहे. खासदार उदयनराजे हे बँकेत विरोधक नाहीत तर संचालक म्हणून काम करत आहेत. भविष्य काळात काय होईल हे मी आज सांगत नाही, आजपर्यंत ती प्रथा पाळली आहे. सगळेजण बँकेचा मानसन्मान ठेवून काम करतात, येवू घातलेल्या निवडणूका शिवसेना म्हणतेय स्वबळावर लढवू, काँग्रेस म्हणते स्वबळावर लढवू, आमचे जिह्यात प्राबल्य आहे. आम्ही नगरपालिकच्या निवडणूका स्वबळावर लढवू असे आमदार शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.
शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादीचे भटक्या विमुक्त सेलचे राठोड, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शशिकांत शिंदे म्हणाले, सहकारी संस्थांमध्ये सहकारी कारखाने काही चुकीच्या निर्णयामुळे किंवा चुकीच्या कारणामुळे डबघाईला आले. लिक्विडेशनमध्ये निघाले. याबाबतीत शासनाच्या स्तरावर रिझर्व्ह बँकेकडून नियमावली केली गेली. तशा प्रकारे निर्णय घेण्याचा प्रकार केला गेला. आज जरंडेश्वर कारखाना असेल, भुईज कारखाना असेल काही बँकेच्याबाबतीत असेल. अपहार होवून लिक्वीडेशनमध्ये आल्या असतील. या राज्यात अनेक सहकारी बँका अवसानायात निघालेल्या आहेत. त्याच्यामध्ये कारवाई करत असताना सभासदांची ठेवीदारांची सुरक्षितता फार महत्वाची असते.माझ्या माहितीनुसार बॉडी बरखास्त करुन प्रशासक नेमले जाते. कारवाई केली जाते. ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित कशा राहतील, थकीत कर्जाची वसुली कशी केली जाईल हे पाहिले जाते. इथेच नव्हे तर देशात सुद्दा नॅशनल बँका प्रचंड प्रमाणात अपहार झाला होता. अर्थमंत्र्यांनीही लोकसभेत निवेदन दिले होते. 56 हजार कोटींचा गैरव्यवहार झाला होता. बँकेतून पैसे घेवून गेले होते अशी वस्तुस्थिती आहे. यांच्यावर कायदा करण्यासाठी केंद्राने भूमिका घेतली होती. जे जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे सांगत पुढे म्हणाले, जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा आणि निवडणूक हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने सोशल डिसटन्स ठेवून सर्वच जण सहभागी झाले होते. उदयनराजे हे बँकेत विरोधक नाहीत. ते संचालक आहेत. बँकेत कोणी ह्या पक्षाचा कोण त्या पक्षाचा असे मानले जात नाही. हे पथ्य पाळले गेले आहे. यापुढे काय होईल हे सांगू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
तुकाराम महाराज कसे त्यांना दिसले नाहीत
पुण्यामध्ये केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या वक्तव्याबाबत छेडले असता ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायची कोणाला गरज नाही. तुकाराम महाराज कसे त्यांना दिसले नाहीत, अशी टीप्पणी केली.