प्रतिनिधी/ सातारा
नगरपालिकेतील ते चार लाचखोर पुन्हा सेवेत रुजू होण्याची शक्यता असून सातारा नगरपालिकेच्या मार्फत त्या चार जणांना पुन्हा सेवेत रूजू करून घ्यावे, असा प्रस्ताव नगरपरिषद प्रशासन संचनालय मुंबई येथे पाठवण्यात आला आहे.
सातारा नगरपालिकेतील आरोग्य विभागातील भोंगळ कारभार नेहमीच चव्हाटय़ावर आला आहे. आरोग्य विभागात अनेक जणांचे हात ओले झाले असल्याची चर्चा होतीच, मात्र गेल्या वर्षभरापूर्वी उपमुख्य अधिकारी संचित धुमाळ व आरोग्य विभागातील कायगुडे, यादव व टोपे या तीन आरोग्य निरीक्षक यांनी टेंडर प्रक्रियेत लाच घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या चार ही अधिकाऱयांना पकडल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. तब्बल वर्षभरानंतर या चार अधिकाऱयांना पुन्हा सेवेत रुजू करावे, असा प्रस्ताव सातारा नगरपालिकेच्या मार्फत तीन ते चार दिवसांपूर्वी मुंबई येथील नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्याकडे देण्यात आला आहे. हा प्रस्ताव मान्य झाला तर त्यांना लवकरच सातारा नगरपालिकेत पुन्हा सेवेत घेण्यात येईल.
मात्र विश्वासनीय सूत्रानुसार आरोग्य विभागातील या लाच प्रकरणातील कायगुडे, टोपे व यादव या अधिकाऱयांना आरोग्य विभागाचाच चार्ज हवा असल्याची चर्चा सातारा नगरपालिकेत सुरू आहे. या तीन जणांना नगरपालिकेतील आरोग्य विभागात पुन्हा चार्ज दिल्यास ये रे माझ्या मागल्या अशी म्हणण्याची वेळ सातारकरांवर येऊ शकते अशी चर्चा सुरू आहे.