ऑनलाईन टीम / नगर :
जिल्हय़ात आढळलेल्या पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचे 14 दिवसांनंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याच्या पार्श्वभूमीवर या कोरोनामुक्त रुग्णास रविवारी घरी सोडण्यात आले. आता त्याला घरीच आणखी 14 दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. आरोग्य यंत्रणेच्या योग्य उपचारामुळे हा रुग्ण लवकर बरा होऊ शकला, ही अतिशय दिलासादायक बाब असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.
जिल्हय़ात नगर शहरातील व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने तात्काळ पावले उचलत त्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तसेच त्याचे घशातील स्राव नमुने चाचणीसाठी पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठवले होते. त्या अहवालानंतर त्या व्यक्तीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे तात्काळ त्याला बूथ हॉस्पिटल येथे आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू होते. 27 मार्च रोजी 14 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचे स्राव पुन्हा तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले. तो अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर पुन्हा चाचणी करण्यात आली. तो अहवालही प्राप्त झाला. हा अहवाल निगेटिव्ह आल्याने हा रुग्ण कोरोनातून बरा झाल्याचे स्पष्ट झाल्याचे द्विवेदी यांनी सांगितले. त्यानंतर या रुग्णाला आज घरी सोडण्यात आले. सर्वांनी काळजी घ्यावी. सरकार व प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन या रुग्णाने सर्वांना निरोप देताना केला.
जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा पोलीस दल प्रयत्न करीत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. प्रत्येक नागरिकाने या विषाणू संसर्गाचा धोका ओळखावा आणि सामाजिक बांधिलकी म्हणून तसेच स्वतःच्या व समाजाच्या आरोग्यासाठी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.