हेलिकॉप्टर, रणगाडय़ांच्या अचूक ‘प्रहारा’चे दर्शन : मित्रराष्ट्राच्या सैन्यासह सर्व निमंत्रितही ठरले साक्षीदार
नगर / विशेष प्रतिनिधी :
आकाशातून वायूवेगाने येत बॉम्ब टाकणारे हेलिकॉप्टर, शत्रूवर अचूक मारा करत त्यांचा वेध घेणारे भारतीय रणगाडे अन् भारतीय सैन्याने शत्रूच्या चौक्यावर ताबा मिळवत फडकविलेला तिरंगा ध्वज…अशा श्वास रोखून धरायला लावणाऱया युद्धप्रात्यक्षिकांचा थरार अहमदनगर येथील के. के. रेंज येथे सोमवारी प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला.
भारतीय लष्कराच्या अहमदनगर येथील आर्म्ड कोअर सेंटर व स्कूल, मॅकेनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे के. के रेंजवर ऑपरेशन ‘कवच प्रहार’ या युद्धप्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख मेजर जनरल एस झा आणि मित्रराष्ट्रांच्या लष्कराचे प्रतिनिधी उपस्थित होते. तब्बल दोन तास चाललेल्या या युद्धसरावाची तीन भागात विभागणी करण्यात आली होती. पहिल्या भागात रणगाडे, बीएमपी वाहने आणि हल्ल्यासाठीची हेलिकॉप्टर यांच्या यांत्रिक कौशल्याची, तर दुसऱया भागात लष्कराकडे असलेल्या विविध रणगाडे आणि चिलखती वाहनांची माहिती देण्यात आली. तिसऱया टप्प्यात रणगाडय़ाच्या साहाय्याने युद्धभूमीवर वेगवान हालचाली करून शत्रूवर विजय कसा मिळवतात, हे दाखवण्यात आले. मित्रराष्ट्राचे सैन्य आणि सर्व निमंत्रितही याचे साक्षीदार ठरले.
स्वरुप बदलले, तरी रणगाडय़ांचे महत्त्व कायम : एस झा
मेजर जनरल एस झा म्हणाले, आजच्या युद्धाचे स्वरूप बदलले आहे. युद्धामध्ये अधिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. रणगाडा युद्धपद्धती भविष्यात टिकेल की नाही, यावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. मात्र, रणगाडे महत्त्वाचे असून, यातून शत्रूवर वेगाने प्रहार करून त्याला हरवता येऊ शकते. त्यामुळे भविष्यातही रणगाडय़ांचे महत्त्व कायम राहील.
रणगाडय़ांमध्ये उच्च तंत्रज्ञानाचा समावेश
अर्जुन, भीष्म, अजय, टी-90 या संगणकप्रणालीने युक्त असणाऱया रणगाडय़ांमध्ये अतिउच्च धूर निर्माण करण्याची क्षमता आहे. धोक्याच्या परिस्थितीत शत्रूला हुलकावणी देऊन पुन्हा तीव्र हल्ला चढविण्याचे सामर्थ्य या रणगाडय़ांमध्ये आहे. या रणगाडय़ांमध्ये रात्रीची परिस्थिती दिवसासारखी स्पष्टपणे दिसू शकेल, असे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यांच्यात क्षेपणास्त्र, अणूयुद्धात शत्रूचा मारा निष्प्रभ करण्याचीही क्षमता आहे. तसेच जवानांना वाहून नेण्यासाठी हे रणगाडे उपयुक्त ठरतात.