प्रतिनिधी/ सातारा
गणेशोत्सव काही दिवसांवर येवून ठेपला आहे. शहरातील भुयारी गटरच्या कामामुळे ठिकठिकाणी रस्त्याला खड्डे पडले आहेत. हे खड्डे अजून मुजवले नाहीत. अशा नागरिकांच्या तक्रारी आल्याने लेबर ठेकेदार राठोड याची चांगलीच नगराध्यक्षा माधवी कदम यांनी कानउघडणी केली. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांचे खड्डे का मुजवले नाहीत. काम कधीपर्यंत पूर्ण होईल ते सांगा?, उरलेले खड्डे बुजवून रस्ते चांगले झाले पाहिजेत. माझ्यापर्यंत तक्रार आली नाही पाहिजे, अशा शब्दात त्यांनी फटकारले. दरम्यान, मोबाईलमधील फोटो दाखवून लेबर ठेकेदार राठोड याने आढावा मांडला.
भुयारी गटरच्या कामामुळे शहरातील पश्चिम भागात रस्त्याची अक्षरशः चाळण उडाली आहे. प्रत्येक गल्लीबोळामध्ये भुयारी गटरचे चेंबर रस्त्यावर आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूची उदसलेले खडी असे चित्र आहे. त्यातच खड्डे पडलेले आहेत. अशा दयनिय रस्त्यावरुन गाडी चालवणे सोडा पायी चालताना नको वाटते. याबाबत सातारा पालिकेत नगराध्यक्षा माधवी कदम यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. गणेशोत्सवापुर्वी रस्त्याचे खड्डे बुजवण्यात यावेत अन्यथा आंदोलन करु असा इशारा दिला होता. त्यावर हे काम करणाऱया लेबर टेकेदार राठोड यास मागच्या आठवडय़ातच या कामांचा आढावा देण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्याने सोमवारी सकाळी येऊन त्यांच्याकडे आढावा दिला. कोणत्या कोणत्या ठिकाणचे खड्डे मुजवले आहेत हे मोबाईलमध्ये फोटो काढून नगराध्यक्षा माधवी कदम यांना दाखवले. दरम्यान, हे खड्डे खरोबर बुजवले गेले आहेत का हे मी जाग्यावर जावून पाहणार आहे. खरे सांगा अजूनही खड्डे तसेच आहेत नागरिक माझ्याकडे तक्रारी करत आहेत. काम हे गणेशोत्सवापूर्वी झाले पाहिजे, अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या.
राठोडची उडाली भंबेरी
चुकीचे काम करणाऱया राठोड यांच्याकडे ज्या ठेकेदाराने काम दिलेले आहे. त्यास कडक शब्दात पालिकेच्या अधिकाऱयांनी व उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी सुनावल्याने आज नगराध्यक्ष माधवी कदम यांनी आढावा घेताना त्याची चांगलीच भंबेरी उडाली होती.