खानापुरात राजकीय हालचालींना वेग : नगराध्यक्षपद सामान्य आल्याने 19 पैकी 18 नगरसेवक निवडणूक लढवण्यास पात्र
प्रतिनिधी / खानापूर
अखेर खानापूर नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. यानंतर दोन्ही पदांसाठी इच्छुकांच्या राजकीय हालचालींना आता वेग आला आहे. यामध्ये नगराध्यक्षपद सामान्यसाठी तर उपनगराध्यक्ष अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव आले आहे. नगराध्यक्षपद सामान्य आल्याने या पदासाठी 19 पैकी 18 जण नगरसेवकही निवडणूक लढवण्यास पात्र आहेत. तर उपनगराध्यक्ष पद अनुसूचित जमाती महिलेसाठी असल्याने या पदासाठी एकमेव नगरसेविका पात्र असल्याने त्यांची निवड आता निश्चित झाली आहे. मात्र नगराध्यक्षपदाची माळ नेमकी कुणाच्या गळय़ात पडणार, याचे उत्तर मात्र बुधवार दि. 21 ऑक्टोबर रोजी होणाऱया निवडणुकीनंतरच समजणार आहे. पण काही असो एकदा नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आता 25 महिन्याच्या कालावधीनंतर का होईना, नगरसेवकांना आता नगरपंचायतीमधील हक्काच्या खुर्चीवर बसण्याचे भाग्य मिळणार आहे.
खानापूर नगरपंचायतीची निवडणूक दि. 31 ऑगस्ट 2018 रोजी झाली होती. तर निवडणुकीचा निकाल दि. 3 सप्टेंबर 2018 रोजी झाला होता. यानंतर नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदासाठी आरक्षणही जाहीर झाले होते. त्यावेळी नगराध्यक्षपद अ वर्गासाठी तर उपनगराध्यक्ष पद अनुसूचित जातीसाठी राखीव आले होते. त्यावेळी देखील नगराध्यक्ष पदासाठी 9 नगरसेवक पात्र होते. पण त्यावेळी नगराध्यक्षपदी रफिक खानापुरी यांच्या निवडीची शक्यता अधिक होती. तर उपनगराध्यक्षपदी लक्ष्मण मादार हे एकमेव नगरसेवक पात्र असल्याने त्यांची निवड निश्चित झाली होती. पण त्यावेळी संपूर्ण राज्यातील नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदाच्या आरक्षणालाच उच्च न्यायालयातून स्थगिती आल्याने त्यावेळी निवडणुकीचा कार्यक्रमच जाहीर होऊ शकला नाही. यानंतर गेली दोनवर्षे आरक्षणाचा वाद न्यायालयातच सुनावणीसाठी पडून होता. अखेर त्याची अंतिम सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आरक्षणासाठी मार्गदर्शक सूची दिली होती. त्या मार्गदर्शक सुचीनुसार राज्य शासनाने पुन्हा एकदा नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर केले. त्या आरक्षणानुसार आता खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
खानापूर नगरपंचायतीच्या नगरसेवकांची एकूण संख्या 20 आहे. त्यामध्ये जानेवारी 2019 मध्ये वॉर्ड क्रमांक 5 चे नगरसेवक व माजी नगराध्यक्ष सिद्धोजी गावडे यांचे आकस्मिक निधन झाल्याने ती जागा रिकामी झाली होती. पण एक वर्षानी म्हणजे जानेवारी 2020 ला त्या जागेची पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये भाजप उमेदवार अप्पय्या कोडोळी यांना विजय मिळाला. तर दोन महिन्यापूर्वी वॉर्ड क्रमांक 12 चे नगरसेवक व माजी नगराध्यक्ष रफिक खानापुरी यांचेही आकस्मिक निधन झाल्याने ती जागा रिकामी राहिली आहे. यामुळे आता 19 नगरसेवक मतदानात सहभागी होणार आहेत. वास्तविक नगराध्यक्षपदी रफिक खानापुरी यांची निवड जवळजवळ निश्चित होती. आणि ते नगराध्यक्ष झाले असते तर खानापूरच्या विकासालाही चालना मिळाली असती. पण दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. तर उपनगराध्यक्ष पद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव आल्याने त्या जागेला वॉर्ड क्रमांक 4 च्या नगरसेविका लक्ष्मी अंकलगी या एकमेव पात्र असल्याने त्यांची निवड निश्चित झाली आहे.मात्र नगराध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ नगरसेवक नारायण मयेकर तसेच माजी नगराध्यक्ष कै. रफिक खानापुरी यांचे चिरंजीव मजहर खानापुरी यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. त्या दोघांनीही आता नगरसेवकांच्या गाठीभेटी घेण्यास प्रारंभ केला आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार दोघाही नगरसेवकांकडे प्रत्येकी 8 नगरसेवक असून उर्वरित दोन ते तीन नगरसेवक आपल्याकडे यावेत, यासाठी दोघांचीही बरीच धावपळ सुरू असून यासंदर्भात गुप्त बैठकाही सुरू आहेत. त्यापैकी मजहर खानापुरी यांनी आपल्या गटातील 8 नगरसेवकांना घेऊन परगावी प्रयाण केल्याची चर्चा आहे. तर नारायण मयेकर यांना पाठिंबा देणारे नगरसेवक मात्र खानापुरातच आहेत. उर्वरित तीन नगरसेवकांपैकी दोन नगरसेवक ज्यांच्याकडे जातील, त्यांच्या गळय़ात नगराध्यक्ष पदाची माळ पडणार, यात शंका नाही. तरीदेखील सर्व 19 नगरसेवकांनी आपापसात कोणतीही गटबाजी न करता एकत्र येऊन नगराध्यक्ष पदाची निवड करावी, अशी शहरवासियांची अपेक्षा आहे.
खानापूर शहराचा विकास करणाऱया नगराध्यक्षची निवड करण्याची अपेक्षा
खानापूर नगरपंचायतीवर गेले 25 महिने प्रशासकीय राजवट आहे. यामुळे शहराचा विकासही खुंटला आहे. गेल्या 2019 साली झालेल्या लक्ष्मी यात्रेच्या काळात आमदार अंजली निंबाळकर यांनी 9 कोटी रुपये विशेष अनुदान मंजूर करून आणले होते. त्यापैकी साडेचार कोटी सार्वजनिक बांधकाम खाते व साडेचार कोटी नगरपंचायतीला अनुदान मंजूर झाले होते. यामधून शहरातील व शहराबाहेरील काही रस्त्यांचा विकास झाला. त्यानंतर मात्र कोणतेही विकासकाम झाले नाही. सध्या खानापूर शहराची भुयार गटार योजना, 7ƒ24 नळपाणी योजना तसेच शहर विस्तारीकरण योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याने मंजुरीसाठी विशेष प्रयत्न करण्याचे सामर्थ्य असलेल्या नगरसेवकाचीच नगराध्यक्षपदी निवड करणे गरजेचे असून यासाठी कोणतीही गटबाजी न करता सर्व 19 नगरसेवकांनी एकत्र येऊन नगराध्यक्ष निवडावा तरच पुढील विकासकामांचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा आहे.