पाणी वाहून जाण्याच्या वाटा बुजल्या, पावसाळय़ापूर्वी गाळ हटविण्याची मागणी, अन्यथा चार रस्ता ते नगर्से परिसर जलमय होण्याची भीती
प्रतिनिधी / काणकोण
काणकोण पालिका क्षेत्रात नगर्से येथे जलस्त्रोत खात्याने बांधायला घेतलेल्या तळय़ातील गाळ सध्या कोकण रेल्वेच्या उड्डाणपुलाखालील शेतजमिनीत टाकण्यात येत असून ही माती पावसाळय़ापूर्वी जर हटविली नाही, तर चार रस्ता ते नगर्से परिसर जलमय होण्याची भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
जलस्त्रोत खात्याच्या मालकीचे सदर बुजलेले तळे साफ करून त्याची दुरुस्ती आणि सौंदर्यीकरण करणे, या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र त्याचप्रमाणे वॉकिंग ट्रक तयार करणे अशी योजना तयार करून स्थानिक नगरसेवक हेमंत ना. गावकर यांनी हा प्रकल्प संमत करून घेतला आहे. एका केरळीय ठेकेदाराने ही निविदा स्वीकारली असून सध्या जेसीबीच्या साहाय्याने बुजलेल्या तळय़ातील गाळ उपसण्याचे काम चालू आहे. या तळय़ाचा पाण्याचा स्रोत प्रचंड प्रमाणात असून जितका गाळ काढला जातो तेवढय़ा प्रमाणात पाण्याची पातळी वाढताना दिसत आहे.
पाण्याच्या वाटा बुजल्याचा दावा
या तळय़ातील गाळ कोकण रेल्वेने आरक्षित केलेल्या जमिनीत सध्या टाकण्यात येत असून त्यासाठी स्थानिक नगरसेवकाने कोकण रेल्वेकडून संमती मिळविलेली असली, तरी ज्या ठिकाणी हा गाळ टाकण्यात येत आहे त्याच ठिकाणी पावसाळय़ातील पाणी वाहून जाण्याच्या वाटा आहेत. सदर गाळाने त्या वाटा सध्या बुजलेल्या असून पावसाळय़ापूर्वी जर शेतजमिनीत टाकलेली माती इतरत्र हटविली नाही, तर नगर्से ते चार रस्ता हा भाग पाण्याखाली जाऊन त्याचा वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता येथील एक ज्येष्ठ नागरिक दिवाकर भगत यांनी प्रत्यक्ष या भागाची पाहणी केल्यानंतर व्यक्त केली.
पावसाळय़ापूर्वी गाळ काढला जाईल
याबाबतीत जलस्त्रोत खात्याचे साहाय्यक अभियंता अल्लाबक्ष यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते रजेवर असल्यामुळे उपलब्ध होऊ शकले नाहीत. कार्यालयात अन्य अभियंतेही उपलब्ध झाले नाहीत. मात्र या कामावर देखरेख ठेवण्याचे काम जलस्रोत खात्याचे कर्मचारी सतीश देसाई करत असून पावसाळय़ापूर्वी शेतात टाकलेला गाळ काढला जाईल, असे त्यांनी सांगितले.
पावसात वाहतुकीवर परिणामाची शक्यता
महामार्ग विभागाचे साहाय्यक अभियंता सुभाष पागी यांच्याशी संपर्क साधला असता, तळय़ातील गाळ शेतजमिनीत टाकतेवेळी खराब होणारा रस्ता साफ करण्याची सूचना आपण संबंधित ठेकेदाराला दिली होती, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्या ठिकाणी गाळ टाकण्यात येत आहे ती जमीन कोकण रेल्वेने आरक्षित केलेली आहे. त्याचबरोबर पावसाळय़ापूर्वी जर त्या शेतजमिनीत टाकण्यात आलेला गाळ हटविला नाही, तर येथील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता त्यांनीही व्यक्त केली.
उपजिल्हाधिकाऱयांनी लक्ष देण्याची मागणी
नगर्से येथील सदर तळय़ाची दुरुस्ती आणि सौंदर्यीकरण केल्यानंतर या परिसरातील पाण्याचा स्त्रोत निश्चितच वाढणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना एक विरंगुळा केंद्र या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. असे असले, तरी काही ठेकेदार काम झाल्यानंतर टाकलेली माती हटविणे यासारख्या बाकीच्या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचे परिणाम मात्र स्थानिक नागरिकांना भोगावे लागतात हा आजवरचा अनुभव असल्यामुळे तालुक्यातील आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असलेले उपजिल्हाधिकारी प्रीतिदास गावकर यांनी या प्रकाराकडे लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.