वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील बिकट होत असलेल्या कोरोना महामारीच्या परिस्थितीमुळे नजिकच्या भविष्य काळात भारत कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडास्पर्धेचे यजमानपद स्वीकारू शकणार नाही. तसेच या संकटाची स्थिती निवळल्यानंतर काही दिवस बंदीस्त स्टेडियममध्ये क्रीडास्पर्धा घेण्याचा प्रयत्न होईल, असे प्रतिपादन क्रेंदीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी केले आहे.
भव्य बक्षीस रक्मेची प्रत्येक वर्षी देशात होणारी आयपीएल क्रिकेट स्पर्धा स्थगित केल्याने भारतीय क्रीडा क्षेत्रात या स्पर्धेला देण्यात येणाऱया महत्त्वसंदर्भात केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी आपले वरील मत व्यक्त केले. ही स्पर्धा स्थगित केल्याने आयोजकांना कोटय़ावधी रूपयांच्या नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. ऑस्ट्रेलियातील ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणारी आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा लांबणीवर टाकली गेली तर भारतीय क्रिकेट मंडळाने येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान सदर स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
देशातील क्रीडास्पर्धा पुन्हा सुरू करण्यापूर्वी विविध क्रीडाप्रकारातील खेळाडूंना सराव आणि प्रशिक्षणाची जरूरी भासेल. या समस्येचा आम्हाला अधिक गंभीरपणे विचार करावा लागेल. देशातील कोरोना परिस्थितीमध्ये लागलीच सुधारणा होईल त्याची खात्री देता येत नाही, त्यामुळे नजिकच्या भविष्य काळात भारत कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे यजमानपद भूषवू शकणार नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी दिले आहे.
कोरोना महामारी संकटाने देशातील जनतेला अशा परिस्थितीत कसे राहावे हे शिकावे लागेल. त्याचप्रमाणे क्रीडास्पर्धा बंदीस्त स्टेडियममध्ये प्रेक्षकविना घेतल्या जातील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्र शासनाच्या आदेशानंतरच देशातील क्रीडा हालचालीचा विचार होईल. दरम्यान परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर केंद्रातून लॉकडाऊन निर्णयासंदर्भात घोषणा केली जाईल. देशातील जनतेच्या सुरक्षेला नेहमीच अग्रस्थान दिले जाते. त्यामुळे क्रीडास्पर्धा देशात पुन्हा सुरू करण्याची घाई करताना खेळाडूंच्या आरोग्य सुरक्षेला धोका निर्माण करण्याची जबाबदारी आम्ही घेवू शकणार नाही, असेही रिजीजू यांनी सांगितले.
भारतीय क्रीडा प्राधीकरण मंडळाच्या (साईच्या) विविध केंद्रातील सर्व प्रक्रिया तुर्ताला कोरोना महामारीमुळे पूर्णपणे थांबविण्यात आले आहे. ऍथलीटस्च्या तंदुरूस्तीच्या समस्येबाबत ते नेहमीच प्रशिक्षकांच्या संपर्कात आहेत. संबंधीत राज्याच्या तसेच स्थानिक प्रशासनाच्या नियमावलीवरच देशातील क्रीडा हालचाली पुन्हा सुरू करणे अवलंबून राहील, असे केंद्रीय क्रीडामंत्री रिजीजू यांनी सांगितले. 2020 ची टोकियो ऑलिंपिक स्पर्धा एक वर्षांसाठी लांबणीवर टाकण्यात आल्याने भारतीय खेळाडूंना पुर्वतयारीसाठी अद्याप बराच कालावधी मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.