जिल्हाधिकाऱयांना पुन्हा निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्यामध्ये नदाफ-पिंजार समाज मोठय़ा प्रमाणात राहतो. हा समाज शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकीयदृष्टय़ा मागासलेला आहे. त्यामुळे या समाजाच्या विकासासाठी निगम स्थापन करावा, अशी मागणी यापूर्वीही करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा निवेदन देऊन तातडीने निगमची स्थापना करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे.
नदाफ-पिंजार समाज राज्यामध्ये 25 ते 30 लाख असून हा मागासलेला समाज आहे. मुलांना शैक्षणिकदृष्टय़ा शिष्यवृत्ती तसेच राखीवता ठेवणे गरजेचे आहे. समाजातील तरुणांना उद्योगासाठी कर्ज द्यावे, समाजाच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद करावी, यासह इतर मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांमध्ये सरकारने विविध समाजांच्या विकासासाठी निगम स्थापन केले आहेत. तशाच प्रकारे आमचेही निगम स्थापन करून आम्हालाही निधी द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नजीरअहम्मद एस. शेख, इस्माईल नदाफ, आप्पालाल नदाफ, रेहमान नदाफ, बाबू नदाफ, महम्मदअली नदाफ, ए. एम. नदाफ यांच्यासह नागरिक उपस्थित होते.