मतुआ मतदारांचे प्रमाण अधिक : अवैध घुसखोरी, धार्मिक मुद्दा प्रभावी
मतुआ मतदार, हिंदू-मुस्लीम, अवैध घुसखोरी, नागरिकत्व आणि सत्ताविरोधी भावना या घटकांमुळे भाजप नदिया जिल्हय़ात अत्यंत बळकट स्थितीत दिसून येत आहे. येथील 8 मतदारसंघ शांतिपूर, राणाघाट उत्तर-पश्चिम, कृष्णगंज, राणाघाट उत्तर-पूर्व, राणाघाट दक्षिण, चकदाह, कल्याणी आणि हरिंगाटामध्ये 17 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यातील बहुतांश मतदारसंघात हिंदू लोकसंख्याच प्रभावी आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळातच भाजपचा प्रभाव वाढू लागला होता. तेव्हा भाजपने येथील 17 विधानसभा मतदारसंघांपैकी 11 ठिकाणी आघाडी मिळविली होती. तसेच राणाघाट लोकसभा मतदारसंघ सुमारे 2.5 लाखांच्या मताधिक्याने जिंकला होता. भाजपची मजबूत स्थिती आताही दिसून येत आहे.
नदिया जिल्हय़ात मतुआ समुदायाचे मतदार मोठय़ा संख्येत असून मुस्लीम मतदारांचे प्रमाण खूपच कमी आहे. मतुआ समुदाय भाजपसोबत उभा असल्याचे दिसून येत आहे. कारण भाजपने त्यांना कायमस्वरुपी नागरिकत्व देण्याचे आश्वासन दिले आहे. तर नागरिकत्व देण्यापूर्वी संबंधिताला भारताचे मतदार आहात की नाही हे सांगावे लागणार असल्याची भीती तृणमूल काँग्रेसकडून दाखविली जात आहे.
भाजपने अवैध घुसखोरांना हाकलून लावण्याचे आश्वासनही दिले आहे. नदिया हा जिल्हा बांगलादेशच्या सीमेला लागून असल्याने येथे अवैध घुसखोरी पूर्वीपासूनच होत आली आहे. पण आता हे प्रमाण कमी आहे. तर काही वर्षांपूर्वीपर्यंत मोठय़ा प्रमाणावर घुसखोरी झाली आहे. अवैध घुसखोरांनी स्वतःची कागदपत्रेही तयार करवून घेतली आहेत. भाजप अशा घुसखोरांना हाकलणार असल्याचे म्हणत असल्याने स्थानिक वर्ग आनंदी दिसत आहे.
येथील 8 मतदारसंघांमध्ये बहुतांश ठिकाणी भाजप मजबूत स्थितीत दिसून येतो. भाजपने शांतिपूर मतदासंघात खासदार जगन्नाथ सरकार यांनाच उमेदवारी दिली आहे. जगन्नाथ हे स्वतः देखील मतुआ समुदायाचे आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळविला होता. 2016 मध्ये हा मतदारसंघ काँग्रेसने जिंकला होता. तर अजय डे हे त्यापूर्वी 20 वर्षे येथील आमदार राहिले होते. मागील विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने येथील 17 पैकी 13 मतदारसंघांमध्ये विजय मिळविला होता.
तृणमूलने यंदा डे यांनाच उमेदवारी दिली आहे, पण त्यांच्याविरोधात लोकभावना दिसून येत आहे. राणाघाट दक्षिणमध्ये मुकुल मनी अधिकारी भाजपचे उमेदवार आहेत. तृणमूलने येथे बरनाली डे यांना मैदानात उतरविले आहे. ध्रुवीकरणामुळे येथील हिंदू मते अधिकारी यांच्यासाठी एकजूट होत असल्याचे मानले जातेय. बरनाली डे यांच्याबद्दल प्रस्थापितविरोधी भावना देखील प्रबळ आहे.
कल्याणी आणि हरिंगाटा मतदारसंघात तृणमूल काँग्रेस बऱया स्थितीत असल्याचे मानले जात आहे. कारण येथे तृणमूल उमेदवारांबद्दलची नाराजी कमी आहे. कल्याणीत अनेक कामे झाली आहेत, एम्सची निर्मिती झाल्याने स्थानिक लोक समाधानी दिसून येत आहेत. तर रानीघाट उत्तर-पूर्व आणि कृष्णनगंज मतदारसंघात भाजप आघाडीवर असल्याचे मानण्यात येते.
8 पैकी किमान 5 जागा भाजप जिंकू शकते, कारण तृणमूलविरोधात अँटी इनकम्बेंसी आहे. तसेच मतुआ समुदाय भाजपच्या पाठिशी उभा राहिला आहे. ध्रूवीकरणही झाल्याने भाजपला लाभ मिळत आहे. अल्पसंख्याक मते तृणमूलला मिळणार असली तरीही त्यांचे येथील प्रमाण खूपच कमी आहे. याचमुळे विजय-पराभवावर विशेष प्रभाव पाडू शकणार नाहीत. हरिंगाटामध्ये अब्बास सिद्दीकी यांचा काहीसा प्रभाव असल्याने ते तृणमूलच्या मतांना खिंडार पाडू शकतात. यातून भाजपलाच लाभ होऊ शकतो.