पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
मलप्रभा, घटप्रभा नदीकाठावरील अतिक्रमणामुळे पूर परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे या संबंधी संपूर्ण सर्व्हेक्षण करुन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन अतिक्रमणावर कायम स्वरुपी तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती पाठबंधारे मंत्री व पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिली.
शनिवारी सुवर्ण विधानसौधमध्ये मलप्रभा व घटप्रभा नदीकाठावरील अतिक्रमणासंबंधी अधिकाऱयांशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्र्यांनी वरील माहिती दिली. नदीकाठावरील अतिक्रमण हे पूराचे प्रमुख कारण आहे. नदी प्रवाहीत होण्यासाठी अडथळे नसायला हवेत. त्यामुळे आधी सर्व्हेक्षण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यासंबंधी कायम स्वरुपी योजना तयार करुन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. सर्व्हेक्षणानंतर संबंधित जिह्यांच्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी बोलताना विधानसभेचे उपसभापती आनंद मामनी म्हणाले, आदी सर्व्हेक्षण करुन अतिक्रमण कोठे झाले आहे? या संबंधीची माहिती घेवूनच पुढील निर्णय घेणे योग्य ठरणार आहे. याबरोबरच नदीकाठावरील निराश्रीतांचे पुनर्वसन करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रादेशिक आयुक्त आदित्य आमलान बिश्वास म्हणाले, पावसाळय़ात पूराची शक्यता असते म्हणून नदीकाठावरील अतिक्रमणे हटविण्यासंबंधी उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. नदी व नदीकाठावर कायद्याने सरकारचा हक्क असतो. या परिसरात कोणी तरी घरे बांधली, जमीन कसली तर ते अतिक्रमण ठरते. घरे बांधलेल्या गरीबांना निराश्रीत असे गृहीत धरुन त्यांचे पुनर्वसन करणे शक्मय आहे. सर्व्हेक्षणासाठी ड्रोनसह इतर सुविधांचा वापर करण्याची गरज आहे. अतिक्रमण हटविण्याबरोबरच गाळ काढण्यावरही भर देण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी विधानपरिषदेतील मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ, पाठबंधारे खात्याचे अप्परमुख्य सचिव राकेशसिंग, जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षा आशा ऐहोळे, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, बागलकोटचे जिल्हाधिकारी कॅप्टन राजेंद्र, कर्नाटक निरावरी निगमचे व्यवस्थापकीय संचालक मल्लिकार्जुन गुंगे, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. आदी उपस्थित होते. दरम्यान पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर वरिष्ट अधिकाऱयांचीही या संबंधी बैठक झाली.