दहा वर्षांत 50 पेक्षा जास्त जणांना बुडून मरण : पर्यटन खात्याने यंत्रणा उभारण्यासाठी गांभीर्य दाखवावे
प्रतिनिधी / वाळपई
सत्तरीतील प्रदुषणापासून अलिप्त राहिलेल्या नदीवर आंघोळ करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत असून त्याठिकाणी सरकारी सुरक्षा यंत्रणा कमी पडत असल्याने गुह्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. रविवारी येथील नदीत डिचोली येथील शुभम अर्जुन पाटील यांचे दुर्दैवी निधन झाल्यानंतर नागरिकांनी या संदर्भात चिंता व्यक्त केली असून येणाऱया काळात अशा घटना घडण्याची भीती व्यक्त केली आहे. यामुळे सरकारने सुरक्षा यंत्रणा उभारण्यासाठी पर्यटन खात्याच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची मागणी सत्तरीतील नागरिकांनी केली आहे.
अनेक सुंदर स्थाने अनेकांना भुरळ पाडतात
सत्तरीतील म्हादई, वाळवंटी, वेळुस, रगाडा आदी नद्या प्रदुषणापासून अद्याप अलिप्त आहेत. त्यामुळे स्वच्छ पाण्यात आंघोळ करण्याची इच्छा असलेले नागरिक मोठय़ा प्रमाणात या नदी तीरावर आंघोळीसाठी येत असतात. राज्याच्या विविध भागातील निसर्गप्रेमी व नागरिकांसाठी सत्तरीतील अनेक विकसित झालेली नदीस्थाने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून सत्तरी तालुक्यात ग्रामीण पर्यटन विकासासाठी प्रयत्न होणे गरजेचे होते मात्र तसे न होता नागरिक स्वतःच्या जीवाची व सुरक्षेची काळजी घेत या नद्यावर आंघोळ करताना दिसतात. सत्तरी तालुक्मयात सरकारने जलसंपदा खात्याच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात बंधाऱयांची उभारणी केलेली आहे. त्यामुळे या सर्व नद्यांवर मोठय़ा प्रमाणात पाण्याचा साठा होतो. हा पाण्याचा साठा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असल्यामुळे अनेक नागरिक सहकुटुंब या नदीकिनारी सहलीसाठी येतात.
आतापर्यंत अनेकांना जलसमाधी
सत्तरी तालुक्मयातील नद्या या खडकाळ स्वरुपाच्या असल्यामुळे पाण्याचा अंदाज येत नसल्याने आतापर्यंत अनेकांना जलसमाधी मिळाली आहे. म्हादई नदीच्या सोनाळ याठिकाणी असलेल्या म्होवाचो गुणो व भिरोंडा सत्तरी येथील नदीचे ठिकाण आतापर्यंत अनेकांसाठी असुरक्षित बनले आहे. तरीही ही स्थाने नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. मात्र गेल्या दहा वर्षांत जवळपास 50 पेक्षा जास्त जणांना या ठिकाणी जलसमाधी मिळाली आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक असून यासंदर्भात आवाज उठवूनसुद्धा सरकारचे पर्यटन खाते अद्यापही निद्रिस्त अवस्थेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सोनाळ भागातील तरुणांनी आवाज उठवून याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी वारंवार केली होती. त्यानुसार वाळपई पोलीस स्थानकातर्फे काही दिवस पोलीस पहारा ठेवण्यात आला.
सातत्याने होणाऱया दुर्घटनांना सरकारच दोषी – समाज कार्यकर्ते सयाजी देसाई
रविवारी भिरोंडा याठिकाणी घडलेल्या प्रकारावरून नागरिकांनी चिंताजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. येथील समाज कार्यकर्ते सयाजी देसाई यांनी याबाबत चिंता व्यक्त करताना, भिरोंडा येथे सातत्याने होणाऱया अशा दुर्घटनांना सर्वस्वी सरकार व स्थानिक पंचायतीला दोषी ठरविले आहे. स्थानिक पंचायती या संदर्भात आवाज का उठवत नाही? असा सवाल त्यांनी केला असून येणाऱया काळात अशा घटनांची पुनरावृत्ती झाल्यास त्याला स्थानिक पंचायत यंत्रणा जबाबदार राहील, असा आरोप त्यांनी केला. अशा प्रकारच्या दुर्घटनांमुळे गावाची बदनामी होत असून त्याला जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी व्यक्त केला.
सुरक्षा यंत्रणा उभारावी, विकास करावा – सरपंच उदयसिंग राणे
भिरोंडाचे सरपंच उदयसिंग राणे यांनी अशा घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे. यापूर्वी पंचायतीने वारंवारपणे सदर ठिकाणी सुरक्षा यंत्रणा निर्माण करावी व पर्यटन खात्याच्या माध्यमातून सदर भागाचा विकास करावा, अशी मागणी व यासंदर्भात ठराव सरकारला सादर केलेला आहे मात्र याबाबत कोणतीही दखल अजूनपर्यंत सरकारने न घेतल्यामुळे अशा दुःखद घटना घडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आतातरी सरकारने यासंदर्भात जागरुक होऊन अशा दुर्घटना रोखण्यासाठी आवश्यक सुरक्षा यंत्रणा उभारावी, अशी मागणी केली असून याबाबत आपणही प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
ग्रामीण पर्यटन स्थळांवर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी
– पंचसदस्य सदा गावकर
पंचायतीचे पंचसदस्य सदा गावकर यांनी सरकारने ग्रामीण पर्यटन विकासावर गांभीर्याने लक्ष देत असतानाच अशा पर्यटन स्थळावर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. या भागातील नद्यांवर अशी सुंदर स्थाने विकसित होणे, ही निसर्गाची किमया असून यामुळे स्थानिक विकासाला चांगली संधी आहे मात्र जोपर्यंत सरकार अशा ग्रामीण स्थळांकडे विकासाच्या दृष्टीने लक्ष देत नाही तोपर्यंत अशा दुर्घटनांमुळे या स्थळांचा विकास सोडूनच द्या, गावाची मात्र बदनामी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
गावाची बदनामी, गांभीर्याने लक्ष द्यावे – उपसरपंच तेरेझा आंद्राद भिरोंडाच्या उपसरपंच व स्थानिक पंचसदस्य तेरेझा आंद्राद यांनीही यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. अशा वारंवारपणे घडणाऱया दुर्घटर्नंमुळे गावाची बदनामी होत आहे. तसेच नागरिकांमध्ये चिंताही वाढत जाते. सरकारने अशा घटनांकडे दुर्लक्ष न करता गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. स्थानिक पंचायतीने अनेकवेळा सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र अजूनपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने, आंद्राद यांनी खंत व्यक्त केली. सरकारने निदान आतातरी जागरुक होऊन याबाबत सुरक्षा निर्माण करण्याच्या दृष्टीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत तेरेझा आंद्राद यांनी व्यक्त केले आहे.