जलतज्ञ प्रदीप पुरंदरे यांचे प्रतिपादन, शहरी पुरप्रवण क्षेत्र वाढल्याने पुनर्विचार गरजेचा
प्रतिनिधी / कोल्हापूर
शहरी भागात 60 टक्के असलेले पुरप्रवण क्षेत्र दोन महापुरांनी वाढले आहे. ते 65 टक्क्यांवर गेले आहे. याकडे गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी नदीपात्रातील अतिक्रमणाचा शास्त्रीय पद्धतीने सर्व्हे आवश्यक आहे. पुर ओसरण्यास ऊस पीक कारणीभुत ठरत असेल तर ऊस लावणीची पद्धत बदला, असे स्पष्ट प्रतिपादन जलतज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी केले.
`महापूर कारणे आणि उपाय’ यासंबंधी राज्यातील जलतज्ञ प्रदीप पुरंदरे यांच्या नेतृत्वाखालील पर्यावरणतज्ञांचे पथक बुधवारी कोल्हापुरात आले. जलतज्ञ पुरंदरे यांच्या पथकाने पुरप्रवण भागाची पाहणी केली. दुपारी शिवाजी विद्यापीठातील भुगोल विभागात कोल्हापुरातील कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधकांसमवेत त्यांनी संवाद बैठक घेतली. बैठकीत जिल्हÎातील अभ्यासकांची मते त्यांनी जाणून घेतली.
जलतज्ञ पुरंदरे म्हणाले, 2005 नंतर महापुरासंदर्भात अभ्यास खूप झाला, पण दुर्दैवाने त्याची अंमलबजावणी झाली नाही. पुर्वीच्या पुरप्रवण क्षेत्रात वाढ झाली आहे. शहरी भागात ते 60 टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे नदीपात्रातील अतिक्रमण पुरासाठी कारणीभुत ठरत असतील तर त्यांचा स्वतंत्र अन् शास्त्रीय पद्धतीने सर्व्हे आवश्यक आहे. याकडे गांभिर्याने पहाणे आवश्यक असल्याचे सांगितले.
ते म्हणाले, पूर ओसरण्यास ऊस पीक कारणीभूत ठरत आहे. उसामुळे जमिनीत पाणी मुरणे त्याचा निचरा होण्यास उशीर होत आहे. त्यामुळे दोन सरींतील अंतर वाढवा, ऊस लावणीची पद्धत बदला, अशी सुचना त्यांनी केली.
बैठकीत भुगोल विभागप्रमुख डॉ. सचिन पन्हाळकर यांनी कोल्हापुरातील पुरस्थितीचे सादरीकरण केले. गिरीश फोंडे यांनी स्वागत केले. बैठकीत पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, डॉ. मधुकर बाचुळकर, शिवाजी परूळेकर, प्रसाद जाधव, `आप’चे संदीप देसाई, सिव्हील इंजिनिअर चंद्रकांत कांडेकरी, सुभाष आठल्ये, प्रकाश कांदे, सुनील भाटवडेकर, आदम मुजावर, आर्किटेक्ट संघटनेचे महेश जाधव, एन. एस. पाटील, आदींनी मते मांडली. यामध्ये पुरपट्टÎातील ऊस पीक, अतिक्रमणे, भराव, मुळ नदीपात्राची कमी झालेली रूंदी आदी प्रश्न मांडले.
या सर्व प्रश्नांना अनुसरून जलतज्ञ पुरंदरे यांनी कोल्हापुरातील पुरासंदर्भात व्यापक अशी मांडणी केली. त्यांनी चार ते पाच दिवसांत पाऊस जास्त झाला, हे खरे आहे. पण काही ठिकाणी पाणी मोजलेच गेले नाही. आपल्याकडे यासंदर्भात असलेले सॉफ्टवेअर अपडेट होणे आवश्यक आहे. बदलत्या हवामानाचा विचार करता `थिंक ग्लोबल अँड ऍक्ट लोकल’ असा संदेश त्यांनी प्रशासनाला दिला.