भाजप आमदारांनी झारखंड विधानसभेबाहेर केले भजन
वृत्तसंस्था/ रायपूर
झारखंड विधानसभेत नमाजासाठी स्वतंत्र कक्षाची व्यवसथा करण्यात आल्याने राज्यातील राजकारण पेटले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱया दिवसाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विधानसभेबाहेर भाजप आमदारांनी टाळ-मृदुंगाच्या तालात भजन म्हटले आहे. तर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि अर्थमंत्री रामेश्वर उरांव यांनी हनुमान चालीसाचे पठण केले आहे.
नमाजासाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्याचा आदेश विधानसभा अध्यक्षांना मागे घ्यावा लागेल, तरच विधानसभेचे कामकाज चालू शकणार असल्याचे भाजप आमदारांनी म्हटले आहे. श्रद्धेप्रकरणी राजकारण करू नये, वेळेत नमाज करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करण्यात आला आहे, या मुद्दय़ाचे भाजप राजकारण करू पाहत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 2 सप्टेंबर रोजी विधानसभा अध्यक्ष रविंद्रनाथ महतो यांच्या आदेशानंतर नमाजासाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती.
भाजपकडून विरोधाचा साप्ताहिक कार्यक्रम
या मुद्दय़ावर भाजपने एक आठवडय़ाच्या विरोधाचा आराखडा प्रसिद्ध केला आहे. 6 सप्टेंबर म्हणजेच सोमवारी सर्व जिल्हय़ांमध्ये निदर्शने करण्यात आली आहेत. मंगळवारी सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी निदर्शने केली जातील आणि राज्यपालांच्या नावे जिल्हाधिकाऱयांना निवेदन सोपविले जाणार आहे. बुधवारी राजधानी रांचीमध्ये विधानसभेसमोर भाजप आंदोलन करणार आहे. तर 9 सप्टेंबर रोजी पक्षाचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेत स्थितीची माहिती देणार आहे.