प्रतिनिधी /वडूज/ भोसरे
अनेक नरवीरांच्या महान पराक्रमामुळेच शिव छत्रपतींचे स्वराज्य घडले असे मत वडूज मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष देशमुख यांनी केले. चौकीचाआंबा येथे अखिल भारतीय जिवा सेना, आलुतेदार-बलुतेदार संघटनेच्या वतीने प्रति शिवाजी म्हणून स्वराज्य रक्षणासाठी साक्षात मृत्यूला सामोरे गेलेले वीर शिवाजी काशिद, नरवीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे, वीर शंभूसिह जाधव तसेच नटश्रेष्ठ निळूभाऊ यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे माजी संचालक शिवाजीराव जाधव, हिंदकेसरी विकास तात्या जाधव, भीमराव जाधव (मुकादम) सुभाष जाधव, मुख्याध्यापक हणमंत पवार,संतोष चव्हाण,संयोजक सोमनाथ काळे, सतीश डोंगरे, दत्ता कोळी, शरद कदम, पंकज कदम, अजित वाघ, संतोष मोरे,संभाजी देवकर उपस्थित होते. डॉ. देशमुख म्हणाले, पराक्रमी वीरांचा स्मृतिदिन साजरा केल्यामुळे त्यांच्या त्यागाचे स्मरण नवीन पिढीस होण्यास मदत होणार आहे. आजकाल कोणत्याही संघटनेत समर्पित भावनेने काम करणारे कार्यकर्ते कमी होत असल्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली. धनंजय क्षीरसागर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी त्यांनी निळूभाऊ फुलेंच्या अभिनयाचे अनेक पैलू सांगितले. सोमनाथ काळे यांनी आभार मानले.