निर्दोष अशासाठी म्हणायचे की मी देह आहे, ही भावना जोपर्यंत शिल्लक असते तोपर्यंतची समाधी अवस्था ही जड ओंडक्मयासारखी असते. पण निर्दोष परमसमाधीमध्ये देहकर्म आपोआप होत असतात स्वतःबद्दल कोणताही विचार मनात येत नसतो. तुकोबारायांची अशी अवस्था झाली होती हे आपण वाचलेलेच आहे. थोडक्मयात भक्त पायरी पायरीने उन्नत होऊन भगवत्सवरूप होतो. भक्त भगवंताशी एकरूप झाल्यावर सगळीकडे भगवंताचे अस्तित्व अनुभवत समाधी अवस्थेत राहतो. त्यातील आनंद घेत, सगळय़ाप्रति सारखाच व्यवहार करत परम समाधी साधतो. त्यापुढे मी देही आहे हेही तो विसरतो. म्हणजेच आपल्या देहाचे चाललेले व्यवहार तो त्यापासून वेगळा होऊन अनुभवू शकतो. या अवस्थेत त्याचे देह व्यवहार भगवंत स्वतः पार पाडत असतात. ‘चोखा बैसला निवांत, विठ्ठल नाम उच्चारीत’ असे या अवस्थेचे वर्णन चोखोबाराय करतात. जेव्हा भगवंत भक्तांचे व्यवहार पार पाडतो, त्यांना नेमून दिलेली कामे करतो, तेव्हा भगवंत त्यांचा अंकित झालेला असतो व त्यांनी भक्तांची केलेली कामे ही परब्रह्म होत असतात. हेच ‘निर्दोष भजन’ होय. असे निर्दोष भजन घडायला लागले की, भक्त जे करेल तेच महापूजन, तो बोलेल तेच भगवंताचे महास्तवन, त्याची कर्मे नारायण रूप होत असतात. ‘तुलसी रामायण’ जो श्रद्धापूर्वक वाचेल, ऐकेल, त्यातली शिकवण अमलात आणेल तो नारायण होईल. कारण त्यात सांगितल्याप्रमाणे श्रीरामाने त्याच्या आदर्श वर्तणुकीने नराचा नारायण कसा होतो हे दाखवून दिलेले आहे. असे म्हणतात की इथे भक्ताचे आणि नारायणाचे मन एकच झालेले असते. हाच शुद्ध भागवत धर्म होय. याचे आचरण करणाऱया भक्ताला कसलेही भय नसते आणि कसे असेल? स्वतः भगवंत पाठीमागेच नाही तर बरोबरीने चालत आहेत. आणखी काय पाहिजे? पण असे भाग्यवंत अत्यंत विरळ! बाकीच्यांच्या वाटय़ाला सदोदित कसली ना कसली तरी भीती वाटणे येत असते. ते का बरं? तर आपल्या शरीरात आत्मा आहे याचा यांना पत्ताच नसतो. हे आत्मतत्त्व जे सगळय़ांच्यात आहे त्याबद्दल माहिती नसल्यामुळे जे काय घडत आहे ते मी करतो असे वाटत असते, मग केले ते बरोबर का चूक, ही खात्री नसते. त्यामुळे भीती वाटू लागते आणि नैराश्याने ग्रासलेला माणूस दुःखी होतो. नारदमुनी वसुदेवांना भागवताचा इतिहास सांगत आहेत. सुरुवात जनक राजापासून होते. जनक राजाकडे विद्वान असे नऊ अर्षभ आलेले आहेत. त्यांना राजाने आत्यंतिक क्षेम म्हणजे काय ते सांगा अशी विनंती केल्यावर कवी नावाचे अर्षभ, जे यातील तज्ञ आहेत ते सांगू लागले की, ‘भागवतधर्म जो वेदांनी सांगितला आहे आणि भगवंतानी ज्याला दुजोरा दिला आहे, त्याचे पालन करण्याने माणसाचे सर्वात जास्त कल्याण होते आणि भगवंताची निष्काम भक्ती करून ते साध्य करता येते.’ त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भक्ती सुरू केल्यावर त्याचे परिणाम काय काय होतात ते सांगताना कवी म्हणाले, ‘भगवंतांची मनापासून भक्ती करून, काया, वाचा, मने त्याला आपले सर्वस्व अर्पण करून भक्त धन्य झाला आहे.
क्रमशः