वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार व खूनप्रकरणातील आरोपी मुकेश सिंह याच्या फाशीच्या शिक्षेवर बुधवारी अखेर शिक्कामोर्तब झाला. त्याने राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्याच्या निर्णयाविरोधात त्याने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. दरम्यान, याप्रकरणातील आरोपी विनयकुमार शर्मा याने राष्ट्रपतींकडे दया याचिका केली आहे. त्यामुळे कायद्यातील तरतुदींचा टप्प्याटप्प्याने वापर करत फाशी टाळण्यासाठी नराधमांची धडपड सुरूच असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करताना सर्व कागदपत्रे सादर केली नव्हती. माझ्या याचिकेवर राष्ट्रपतींनी तत्काळ निर्णय दिला आहे. त्यामुळे या निर्णयात हस्तक्षेप करावा, अशी मागणी करणारी याचिका मुकेशच्या वकिलांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये करण्यात आली होती. यावर न्यायाधीश भानुमती, न्या. अशोक भूषण आणि ए. एस. बोपन्ना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. राष्ट्रपतींनी सर्व बाबी व कागदपत्रांची पडताळणी केली आहे. त्यांनी तत्काळ निर्णय दिला म्हणून तो निर्णयच अयोग्य आहे असे होत नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. कारागृहात वाईट वागणूक मिळते म्हणून मुकेश याच्या फाशीला स्थगिती द्यावी, ही मागणीही तथ्यहीन असल्याचे खंडपीठाने या वेळी सांगितले.
निर्भया प्रकरणातील अक्षय कुमार सिंह, पवन सिंह, विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह या दोषी आरोपींना फाशीची शिक्षा 22 जानेवारीला देण्यात यावी, असा आदेश दिल्ली न्यायालयाने दिला होता. मात्र. यानंतर फाशीची तारीख 1
फेब्रुवारी निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी दोषींना भेटण्याबाबत नातेवाईकांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आता चारही दोषींच्या अंतिम इच्छेची प्रतीक्षा आहे, असे तिहार कारागृहाच्या सूत्रांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
फाशीची शिक्षा वाचविण्यासाठी धडपड सुरूच
निर्भया प्रकरणातील दोषी विनयकुमार शर्मा याचा वकील ए. पी. सिंह याने बुधवारी राष्ट्रपतींकडे दया याचना केली आहे. तसेच अक्षय कुमार सिंह, पवन सिंह या दोघांकडेही दया याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. विनयची याचिका फेटाळल्यानंतर हे दोघे याचिका दाखल करतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे कायद्यातील तरतुदींचा टप्प्याटप्प्याने वापर करत फाशी टाळण्यासाठी नराधमांची धडपड सुरूच असल्याचेही स्पष्ट झाले आहे.