‘चौकीदार जागेगा आप चैन की निंद सो जाओ’, असे लोकांना आश्वासन देऊन परत पंतप्रधान बनलेल्या नरेंद्र मोदींसमोर अग्नीपरीक्षेची वेळ आलेली आहे. सारा देशच जणू व्हेंटिलेटरवर आहे.
गेल्या महिनाभरात कोव्हिडच्या त्सुनामीने भारताची लक्तरे जगाला दिसली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारताचा लोकोत्तर नेता ही प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्यात जमा झाली. चीनच्या एका उच्चस्तरीय संस्थेने समाजमाध्यमावर भारताची अब्रू काढली. कोरोना महामारीने भारतात किडा मुंग्याप्रमाणे लोक मरू लागले आहेत तर चीनने या महामारीला केव्हाच हद्दपार केले आहे असा दावा केला. त्या चिनी संस्थेने भारतावरील टीका नंतर समाज माध्यमावरून उडवून टाकली असली तरी तिने ‘दोन पावले पुढे, एक पाऊल मागे’ या ड्रगन खेळीचा भाग आहे हे सुज्ञ जाणतात. लडाखमधील काही अतिशय महत्त्वाच्या भागातील घुसखोरी चीनने मागे घेतलेली नाही आणि तसे करण्याचा त्याचा मानसदेखील दिसत नाही. आता कोव्हिड संकटात भारत सापडला ही चीनकरता पर्वणीच आहे. सत्ताधाऱयांमधील एक वर्गदेखील असे मानतो की सध्या भारताला एकाचवेळी तीन आघाडय़ांवर युद्ध सदृश स्थितीला तोंड द्यावे लागत आहे. एकीकडे कोरोनाची त्सुनामी, दुसरीकडे सतत ढासळत चाललेली अर्थव्यवस्था आणि तिसरी म्हणजे चीनची दादागिरी.
मोदी सरकारची कुवत कमी आहे असा संदेशच सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील इस्पितळांना प्राणवायू पुरवण्यासाठी 12 सदस्यीय कृती दल स्थापून दिला आहे. प्राणवायूच्या अभावामुळे शेकडो रुग्णाचे प्राण देशभर गेले आहेत आणि त्यात सर्वात जास्त आकडा दिल्लीचा आहे. दिल्ली उच्च न्यायालयानेदेखील ज्या पद्धतीने केंद्राला या विषयावर वारंवार फटकारले त्यावरून न्यायालये कोव्हिड विरुद्धच्या युद्धामधील मोदी सरकारच्या कामावर खुश नाहीत असे मानले जाते आणि त्यामुळे दिवसेंदिवस न्यायालयांचा सरकारच्या कामात हस्तक्षेप वाढू शकतो.
देशांतर्गतदेखील मोदींना मापात घेण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राज्यातील नेत्यांशी बोलत असताना पंतप्रधान फक्त ‘मन की बात’ करतात, राज्यांचे प्रश्नच समजून घेत नाहीत अशी त्यांची फिरकी घेतली. 2014 च्या मे महिन्यात पंतप्रधान बनल्यापासून कोणत्याही राज्याच्या नेत्याने त्यांची अशी टर उडवली नव्हती. स्वतःला डोनाल्ड ट्रम्प, व्लादिमिर पुतीन, शी जीन पिंग अशा दर्जाचा जागतिक नेता भासवण्याच्या मोदींच्या प्रोजेक्टचे आंतरराष्ट्रीय स्तरावर बारा वाजलेले दिसत असताना आता त्यांच्या प्रतिमेचे टवके उडवण्याचे काम देशात सुरू झाले आहे ही भाजपकरता निश्चितच आत्ममंथन करायला लावणारी गोष्ट आहे. राजकारणात हार जीत होत असते आणि नेतेमंडळी ते जाणून असतात. पण ममता बॅनर्जीनी ज्या शर्थीने झुंज देऊन बंगालमध्ये भाजपाला नामोहरम केले त्यानंतर पंतप्रधानांनी त्यांना अभिनंदनाचा साधा फोनदेखील केला नाही. फक्त एका ट्विटद्वारे आपली प्रतिक्रिया दिली.
गेली 10 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या ममतादीदींना हे खटकले नसते तरच नवल होते. बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार झाला तो दुर्दैवी पण त्यावर उपाय करण्यासाठी मोदींनी ममताना फोन केला असता तर जास्त बरे झाले असते. पंतप्रधानांनी फोन केला तो राज्याचे राज्यपाल जगदीप धनकर यांना. धनकर आणि ममता यांच्यामध्ये विस्तव जात नाही. गैरभाजप मुख्यमंत्री मग ते हेमंत सोरेन असोत की ममतादीदी अथवा उद्धव ठाकरे हे मोदी सरकारच्या कामाविषयी खुश नाहीत आणि या सरकारातील मंत्री तसेच भाजप राज्याबरोबर राजकारण करते आणि गैरभाजप राज्यांबाबत दुजाभाव बाळगते अशी भावना विरोधी पक्षात वाढीस लागली आहे. आता वेगवेगळय़ा राज्य सरकारांनी लसीकरणाची जंगी मोहीम हातात घेतली असताना त्यांना लसीचा मुबलक पुरवठाच केंद्राकडून होत नाही आहे. त्यामुळे लसीकरणावर देखील राजकारण पेटणार आहे. पूर्ण देशात कडक लोकडाऊन जाहीर करण्याची गरज काही तज्ञ मंडळी तसेच विरोधी पक्षातील बरेच नेते करत आहेत कारण सध्याच्या महामारीच्या दुसऱया टप्प्याहून अतिभयानक अशी तिसरी लाट पुढील काही महिन्यात येणार असे दिसत आहे. भाजपमधील सुब्रमण्यम स्वामी यांच्यासारखे नेते आता मोदी-शहा यांच्या कथित नाकर्तेपणाचे जाहीर भांडवल करून पक्षश्रे÷ाrंना अडचणीत आणत आहेत आणि आव्हानही देत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राष्ट्रीय स्तरावर कोरोना विरुद्धच्या युद्धाचा सेनापती बनवले पाहिजे अशी जाहीर मागणी करून स्वामी यांनी मोदी आणि शहा हे काही कामाचे नाहीत असेच सूचित केले आहे.
इस्पितळे, न्यायालये आणि पीडित ‘प्राणवायू कोठे आहे?’ असा प्रश्न विचारत असताना सरकारचा जीव टांगणीला लागला नसता तरच नवल होते. मोदी हे स्वतःला कणखर नेता असे भासवत असले तरी प्रत्यक्षात ते फक्त ‘बोलका शंख’ आहेत आणि म्हणूनच त्यांना या त्सुनामीचा पत्ताच लागला नाही असा विरोधकांचा दावा आहे. आमच्या पंतप्रधान आणि गृह मंत्र्याकडे काही दृष्टीच नाही तर ते अशा संकटाच्या घडीला काय काम करणार असा सवालच उभा करत आहेत. भाजपने येथे बांधलेल्या नवीन टोलेजंग मुख्यालयाचे रूपांतर कोव्हिड रुग्णालयात केले पाहिजे कारण त्यामधील सोयीसुविधा बघितल्या तर हजारो रुग्णांना त्यामुळे फायदा होईल असे स्वामींसारख्या भाजप नेत्यांचे मत आहे. मोदींसमोर अग्नीपरीक्षेची वेळ आलेली आहे. सारा देशच जणू व्हेंटिलेटरवर आहे आणि पंचायत निवडणूक झालेल्या उत्तर प्रदेशात अतिशय जोराने महामारीचा फैलाव झाल्याची वृत्ते आहेत. ग्रामीण भागात ताप आणि खोकला येऊन लोक पटापट मरत आहेत.
सुनील गाताडे