महिला कामगारांसह विविध संघटनांचे आंदोलन
प्रतिनिधी /बेळगाव
जिह्यातील रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱया कामगारांना गेल्या दोन महिन्यांपासून मजुरी व कामही देण्यात आले नाही. त्यामुळे हे कामगार मोठय़ा अडचणीत आले आहेत. तेव्हा काम उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी रयत कृषी कार्मिक संघटना आणि एआयडीयु संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली.
नरेगा योजनेंतर्गत सध्या देण्यात येणारी मजुरी ही अत्यंत कमी आहे. महागाई वाढली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या मजुरीमध्ये जीवन जगणे कठीण आहे. तेव्हा दिवसाला किमान 600 रुपये वेतन द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
काही ग्राम पंचायतींमधून कामेच उपलब्ध करण्यात येत नसल्यामुळे अनेक जण बेरोजगार होत आहेत. नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे विविध समस्यांना तेंड द्यावे लागत आहे. तेव्हा किमान नुकसान भरपाई तरी तातडीने द्यावी, अशी मागणी करण्यात आली. वर्षाला 120 दिवस काम दिले पाहिजे, असा नियम असताना केवळ 10 ते 15 दिवस काम देण्यात आले आहे. त्यामुळे हे कामगार अडचणीत आले आहेत. तेव्हा या सर्व प्रकाराकडे जिल्हा पंचायतीने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
जिल्हा पंचायतीचे अधिकारी रवी बंगारप्पा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी लक्काप्पा बिजण्णावर, राजू गाणगी यांच्यासह महिला कर्मचारी उपस्थित होत्या.