जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे यांची मागणी :
प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनच्या संकटकाळात शेतकरी वर्गासह कामगार वर्ग कामाविना अन्य ठिकाणी जाऊ नये यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण उद्योग खात्री योजना (नरेगा) अंतर्गत विविध कामे देण्यात आली आहेत. यामुळे बेळगाव जिल्हय़ात विविध ठिकाणी नरेगा योजनेंतर्गत अनेक कामांना सुरुवात झाली आहे. मात्र, अनेक ठिकाणी काम करत असणाऱया कामगार वर्गांना कोरोनाचा फैलाव रोखण्याच्यादृष्टीने आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे जिल्हय़ातील विविध ठिकाणी नरेगा अंतर्गत सुरू असणाऱया कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली असता ही गंभीर बाब दिसून आली. त्यांनी संबंधित पीडीओ आणि अधिकाऱयांना याबाबत चांगलेच सुनावले आहे. आणि कामगारांना आवश्यक सुविधा पुरविण्याची सूचना केली आहे.
कोविड-19 च्या महामारीमुळे सध्या अनेक नियम घालण्यात आले आहेत. मात्र, नरेगा अंतर्गत काम करत असणाऱया अनेक ठिकाणी या नियमांचेच उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित पीडीओ आणि अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षामुळे कामगारांना मास्कसह सॅनिटायझर व अन्य साहित्य पुरविण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. याकडे जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे बनले आहे. अथणी तालुक्यातील गुंडेवाडी आणि मलाबाद ग्राम पंचायत हद्दीत सुरू असणाऱया कामाची पाहणी जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे यांनी केली असता याठिकाणी अनेक त्रुटी दिसून आल्या. कामगारांसाठी मास्कचा पुरवठा करणे आवश्यक असताना पीडीओंनी याकडे दुर्लक्ष केले होते. तर प्रत्येक कामगारास 275 वेतन देणे बंधनकारक असले तरी बऱयाच कामगारांना 150 ते 180 रुपयाचे वेतन देण्यात येत असल्याच्या तक्रारी यावेळी कामगारांनी केल्या आहेत.
पीडीओंकडून दुर्लक्ष
कोरोनाच्या संकटामुळे सध्या प्रत्येक कामगारांना मास्क पुरविणे तसेच सॅनिटायझरचा पुरवठा करणे आवश्यक आहे. तसेच पिण्याचे पाणी व आवश्यक औषधे उपलब्ध ठेवणेही गरजेचे आहे. मात्र काही ठिकाणी एकच साबण ठेवण्यात आले आहेत. नरेगाअंतर्गत सुरू असणाऱया कामात सुमारे 100 हून अधिक कामगार एकाच ठिकाणी काम करत असल्याने अधिक दक्षता घेणे पीडीओचे कर्तव्य आहे. मात्र बऱयाच पीडीओंकडून दुर्लक्ष होत असल्याचे अध्यक्षा आशा ऐहोळे यांनी ‘तरुण भारत’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. नियमांचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे. तसेच दिवसभर कामे करून घेण्याऐवजी सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेपर्यंत कामे करून घेतल्यास सोयीचे ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.