पाणी पुरवठा चार दिवसाआड पण उच्च दाब नसल्याने नागरिकांची शक्कल : अन्य नागरिकांना फटका
प्रतिनिधी / बेळगाव
शहराच्या विविध भागात पाच ते सहा दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. काही भागात चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. मात्र उच्चदाबाने पाणी पुरवठा केला जात नसल्याने मुबलक पाणी मिळत नाही. त्यामुळे काही नागरिकांनी थेट नळालाच विद्युत पंप जोडत असल्याची तक्रार होत आहे. परिणामी अन्य नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी हिडकल जलाशयाच्या विद्युत पंपाची क्षमता वाढविण्यात आली. मात्र पाणीसमस्या जैसे थे आहे. हिडकल जलाशयामधून दररोज सहा एमजीडी जादा पाणी पुरवठा होवूनदेखील शहरवासियांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही भागात पाच दिवसाआड तर काही उपनगरांमध्ये सहा दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पाणी पुरवठा मंडळाचे अधिकारी सांगत आहेत. पण प्रत्यक्षात काही ठराविक भागात 4 दिवसाआड पुरवठा करण्यात येत आहे. राकसकोप आणि हिडकल जलाशयामध्ये मुबलक पाणीसाठा असूनही शहरात पाणी समस्या भेडसावत आहे. पाणी समस्या भेडसावण्यास कारणीभूत कोण, असा मुद्दा उपस्थित होत आहे.
काही ठिकाणी चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पण उच्चदाबाने पाणी पुरवठा केला जात नाही. विशेषतः शास्त्राrनगर, कोनवाळ गल्ली, मिरापूर गल्ली, शहापूर अशा विविध भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे काही नागरिकांनी थेट नळाला विद्युत पंप जोडले. नळाला विद्युत पंप जोडून टाकी भरून घेण्याचा प्रकार वाढला आहे. त्यामुळे अन्य नागरिकांच्या नळाला पाणी येत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. नळाचे पाणी उच्च दाबाने येत नसल्याने नळाला विद्युत पंप लावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे उच्च दाबाने पाणी पुरवठा करावा, अशा तक्रारी पाणी पुरवठा मंडळाकडे करूनही अधिकाऱयांनी याकडे कानाडोळा केला आहे. तसेच नळाला विद्युतपंप लावण्यात येत असल्याची माहिती देऊनही पाणी पुरवठा मंडळाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उच्च दाबाने पाणी पुरवठा करावा तसेच विद्युतपंप लावणाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.