ऑनलाईन टीम/तरुण भारत
पाच राज्यांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यांनतर काँग्रेसचे विचार मंथन सुरु आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बैठक घेत पराभवाचे आत्मचिंतन करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरकीकडे जी २३ नेत्यांनी गांधी कुटुंबाने नेतृत्व सोडून इतरांना संधी द्यावी अशी मागणी केली आहे. यातच सोनिया गांधी यांनी मंगळवारी घेतलेल्या बैठकीनंतर पाच राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा देण्यास सांगितले आहे. सोनिया गांधींच्या आदेशानंतर पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान, नवज्योतसिंह सिद्धू यांनी आठ महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे आपल्या हातात घेतली होती ; पण अंतर्गत कलहामुळे पंजाबमध्ये काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. आता पंजाब विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पंजाबसह इतर चार राज्यांमध्येही काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संघटनात्मक बदलाचे संकेत दिले गेले असून प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार सिद्धू यांनी आपला राजीनामा सोपवला आहे.
काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीनंतर दोन दिवसांनी मंगळवारी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा व मणिपूर या पाचही राज्यांतील ‘पराभूत’ प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याचा आदेश दिला.
सिद्धूंनी ट्विटरला आपण राजीनामा दिल्याची माहिती दिली असून सोबत पत्रही जोडलं आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्षांच्या इच्छेनुसार राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे.
पाच राज्यांमध्ये नामुष्कीजनक पराभवानंतर रविवारी काँग्रेस कार्यकारिणी समितीची साडेचार तास बैठक झाली होती. सोनिया गांधी यांना पक्षाध्यक्ष पदाची धुरा सांभाळण्याची तसेच, आवश्यक संघटनात्मक बदल करण्याचीही विनंती करण्यात आली होती. त्यानुसार पाचही प्रदेशाध्यक्षांना पायउतार होण्यास सांगण्यात आले असून या निर्णयाची माहिती प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीटद्वारे दिली.