सातारच्या नऊ महिलांचे अंबाबाईच्या दर्शनाने सुरु झाले तिर्थाटन, अंबाबाईसह तुळजापूर, माहुरगड,वणी तीर्थस्थळांचे 1868 किलोमिटर अंतर पूर्ण करणार, हिरकणी रायडर ग्रुपचा संकल्प
प्रतिनिधी/कोल्हापूर
साडेतीन शक्ती पीठं म्हणून ओळख असलेल्या करवीरनिवासीनी अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहुरगडची रेणुका, वणीची सफ्तश्रुंगी यांच्या दर्शनासाठी सातारच्या ‘हिरकणी रायडर ग्रुप’च्या नवदुर्गा मार्गस्थ झाल्या आहेत. रविवारी सकाळी अंबाबाईच्या दर्शनाने त्यांनी आपल्या तिर्थाटनाला प्रारंभ केला. सहा दिवस व पाच रात्रीत 1868 किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्याचा संकल्प या नवदुर्गांनी केला आहे. इतक्या लांब पल्ल्याचे अंतर त्यांचा ग्रुप पहिल्यांदाच पूर्ण करत आहे. त्याबद्दल त्यांच्यात आत्मविश्वास व उत्साह दिसून आला.
‘हिरकणी रायडर ग्रुप’च्या लीडर मनिषा फरांदे यांच्या नेतृत्वाखाली अंजली शिंदे, मोनिका निकम-जगताप, अर्चना कुकडे, केतकी चव्हाण, ज्योती दुबे, श्रावणी बॅनर्जी, भाग्यश्री केळकर या नवदुर्गा रविवारी सकाळी सातच्या सुमारास सातारच्या पोवई नाक्यावरील शिवतीर्थ येथून दुचाकीवरुन कोल्हापूरकडे निघाल्या. उद्योजिका, पोलीस अशा विविध क्षेत्रातील महिलांचा यामध्ये समावेश आहे. दहाच्या सुमारास त्यांचे दसरा चौक येथे आगमन झाले. या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या नवदुर्गा अंबाबाई दर्शनाला गेल्या. रांगेतून त्यांनी दर्शन घेतले. यानंतर त्या दुचाकीवरुन पुढील शक्तीपिठांच्या दर्शनाला निघाल्या. मिरजमार्गे जाऊन सांगली येथे त्यांचा मुक्काम असणार आहे. त्यानंतर त्या सोमवारी तुळजापूर (जि.सोलापूर)कडे जाणार आहेत. या ठिकाणी तुळजा भवानीचे दर्शन घेऊन त्या माहुरगड (जि. नांदेड) व वणी (जि. नाशिक) असे पूर्ण साडेतीन शक्ती पीठांचे दर्शन घेणार आहेत. या महिला रायडर 10 जिल्हे व 24 तालुक्यातून जाणार असून त्या सुमारे 1868 किलोमीटरचे अंतर पूर्ण करणार आहेत.