अध्याय दहावा
देहाभिमान आणि ज्ञानाभिमान नसणे तसेच दक्षता, निर्ममता, आप्तपणा, निश्चळता या सच्छिष्याच्या लक्षणांची माहिती आपण घेतली. निश्चळतेमुळे षड्विकारांचा नाश होतो. षड्विकार हे देहाला असतात. पण शिष्य देहबुद्धीला शिवतच नाही. गुरु उपदेशाप्रमाणे वागत असल्यामुळे त्याचे विकार म्हणजे मनाची अस्थिरता नाहीशी होते. अशा प्रकारची निश्चळता साध्य करून जिज्ञासेने तो परमार्थ साधावयाला तयार होऊन गुरुचरणाला भजू लागतो. विषयाचा स्वार्थ सोडून, परिपूर्ण तत्त्वार्थ जाणण्यासाठीच परमार्थाच्या भजनी लागणे म्हणजे जिज्ञासा. अशी तत्त्वजिज्ञासा धारण करून परमार्थाची आवड शिष्य वाढवीत असतो. त्याला स्वहित साधायचा लोभ सुटलेला असतो. त्यामुळे त्याच्या चित्ताला एक क्षणभरही विश्रांती नसते. परमार्थाविषयी अतिशय प्रेम आणि ‘चढती वाढती आस्था’ हे शिष्याचे ‘सातवे’ लक्षण होय. हे सातवे लक्षण जिज्ञासुपणाच्या बळावरच समर्थ होते. सद्गुरु ही पुष्कळ लोकांची सावली आहे, शिष्यवर्गाची तर माउलीच आहे. त्यांच्या ठिकाणी जो असूया करील, त्याची आत्मप्राप्ती दुरावली म्हणून समजावे. याकरिता गुरुचा जो जो अनुग्रहित असेल त्याला शिष्य गुरुसमानच मानतो. तो सर्वांशी अतिशय लीनपणाने वागतो. दुसऱयाचा उत्तम गुण असेल त्याला दूषण लावून त्याचे ज्ञान खोटे आहे असे म्हणणे याचे नाव असूया. प्रत्यक्ष भेट झाली म्हणजे त्याच्या गुणांचे स्तुतिस्तोत्र गायचे, नम्रत्वाने पाय धरायचे, पण लागलीच पाठीमागे त्याची निंदा करायची हे सर्व असूयेतूनच घडते. सच्छिष्य या बाबतीत अगदी शुद्ध असतो. तो आपल्याला असूयेचा विटाळ होऊ देत नाही. समोरचा शिष्य उत्तम असो, मध्यम असो की अगदी साधारण असो, त्या सर्वांना तो वंदनच करतो. छलकपट करणे त्याला माहीतच नसते. गुरुने सर्वत्र ब्रह्मभावना धरावयाला शिकवलेले असते, त्यावर निरंतर लक्ष ठेवून तो सर्वांना समभावानेच वंदन करतो. उद्धवा, कोणत्याही प्राण्याचा छळ न करणे हाच शिष्याचा ‘अनसूया’ नावाचा ‘आठवा’ गुण होय.
देहाभिमान आणि ज्ञानाभिमान नसणे, दक्षता, निर्ममता, आप्तपणा, निश्चळता, परमार्थाविषयी चढत्या श्रेणीत वाटणारे प्रेम आणि अनसूया ही आठ महामण्यांची माळ ज्याच्या हृदयकमली निरंतर वास करते, तो सद्गुरुच्या सान्निध्याला पोचतो. यापुढे नववे लक्षण म्हणजे वायफळ बडबड सोडून तो सत्य व पवित्र भाषण करीत असतो. सद्गुरुला तो लीनतेने आणि मृदु वाणीने प्रश्न करतो आणि गुरुचे वचन हे सत्यातले सत्य होय असे तो भक्तिपुरस्सर मानतो. अनेक प्रकारची मते प्रतिपादन करून अकांडतांडव करणे, पाखांडांचे साहाय्य घेऊन महावादाने तोंड वाजवीत बसणे, साधक बाधक युक्तीच्या साहाय्याने शब्दच्छल करणे आणि आपल्याच कोटीचा डौल मिरविणे या गोष्टी सच्छिष्याच्या मनातही येत नाहीत. सद्गुरुपुढे फाजिलपणाने बोलणे हे मोठे पाप आहे हे जाणून तो व्यर्थ बडबड सोडून देतो आणि मिथ्या वाद करीत नाही.
शिष्याचे बोलणे परिपक्व झालेल्या वाणीतील अमृतासमान असते. प्रेमरसात घोळलेल्या शब्दानी तो एकांतात प्रश्न करीत असतो.
सद्गुरुची प्रार्थना करतानाही तो फारसे बोलत नाही. आत्मसुख मिळण्याचे साधन तो एकाच शब्दात विचारतो. अशी ही शिष्याची नऊ लक्षणे आहेत. ही नवखंड पृथ्वीची भूषणे होत, ती नारायणांनी कृपा करून भक्तांना दिली आहेत. या नवरत्नांची सुंदर माळा जो सद्गुरुच्या कंठात घालील, तो हा हा म्हणता सायुज्य सिंहासनावर बसेल. या नवरत्नांचे पदक ज्या शिष्याच्या हृदयावर रुळत राहील तोच सद्गुरुचा निश्चित विश्वासू होय. या नवरत्नांचा अभिनव गुच्छ जो सद्गुरुला भेट देईल तो स्वराज्याच्या मुकुटावर महामणि होऊन झळकत राहील. या दहाव्या गुरुशिष्य महात्म्य कथन करणाऱया अध्यायात भगवंतांनी सद्गुरु महात्म्य तसेच उत्तम शिष्यलक्षण आत्तापर्यंत सांगितले. भगवंतांना उद्धवाचे पूर्ण समाधान करायचे असल्याने ते आणखी काही गोष्टींचा उलगडा करणार
आहेत.