कोरोनामुळे ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्यावर निर्बंध येण्याची शक्यता
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचा इशारा कोविड तांत्रिक सल्लागार समितीने दिला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून नववर्षाच्या स्वागतानिमित्त होणाऱया आनंदोत्सवावर तसेच सर्व समारंभ, राजकीय कार्यक्रमांवर दोन आठवडे निर्बंध घालण्याचा विचार राज्य सरकारने चालविला आहे. त्यामुळे ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्याच्या तयारीत असणाऱया तरुणाईची निराशा होणार आहे.
विधानसौध येथे शुक्रवारी कोविड तांत्रिक सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी राज्यात कोरोनाच्या संभाव्य लाटेसंबंधी अधिकाऱयांशी चर्चा केल्यानंतर आरोग्य-कुटुंबकल्याण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, राज्यात जानेवारी, फेब्रुवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून पुढील 45 दिवस निर्णायक आहेत. त्यामुळे 20 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत कोणतेही धार्मिक कार्यक्रम, सभा-समारंभ, राजकीय सभा यासह लोक एकत्र येणाऱया सर्व प्रकारच्या कार्यक्रमांवर निर्बंध घालण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. या अहवालाची गंभीरपणे दखल घेऊन कठोर उपाययोजना केल्या जातील. बैठकीत रात्रीचा कर्फ्यू जारी करण्याबाबत सल्लागार समितीने कोणतीही शिफारस केलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
20 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत सर्व सभा-समारंभांवर निर्बंध घालण्याविषयी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्याशी चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. राज्य सरकारनेच कोविड तांत्रिक सल्लागार समितीची रचना केली आहे. त्यामुळे या समितीच्या शिफारसींची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे, असे सांगून मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी नववर्षाच्या स्वागतावेळी होणाऱया आनंदोत्सवावर निर्बंध येणार असल्याचे संकेत दिले आहेत.
राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र, इतर राज्ये आणि देशांचा विचार करता राज्यात जानेवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. यावर तोडगा म्हणून रात्रीचा कर्फ्यू जारी करणे हा पर्याय ठरू शकत नाही. मात्र, पुढील दोन आठवडे कठोर उपाययोजना कराव्या लागणार आहेत. समितीने दिलेल्या सल्ल्यानुसार खासगी सहभागातून कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येतील. शिवाय खासगी इस्पितळांमध्ये कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी बेड उपलब्ध केले जातील. जनतेने देखील सरकारच्या मार्गसूचीचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.