पाणीपुरवठा मंडळाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी/ बेळगाव
सातत्याने पाऊस पडल्याने जलाशये पूर्ण भरल्याची माहिती देणाऱया पाणीपुरवठा मंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे बेळगाव शहराला उन्हाळय़ापूर्वीच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नववर्षाची सुरुवातच मुळी बेळगावकरांसाठी अडचणींचा सामना करणारी झाली आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला हेस्कॉमच्या कारभारामुळे शहर दोन-तीन तास अंधारात राहिले होते.
त्या पाठोपाठ पाणीपुरवठा मंडळानेसुद्धा ‘हम भी कुछ कम नही’ असे म्हणत पाणी टंचाईची पूर्वकल्पना न देता नागरिकांच्या अडचणीत भर टाकली. शुक्रवारी शहराच्या अनेक भागात पाणीपुरवठा झाला नाही. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पाण्याच्या समस्येने महिलावर्ग वैतागला. अर्थात शनिवारी पाणी येणार या अपेक्षेत पुन्हा त्यांना पहाटे उठावे लागले. पण पाण्याची नेहमीची वेळ टळून गेली तरीही पाणी आले नाही.
रविवारी विद्युत पुरवठा खंडित होणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा मंडळाला पुन्हा निमित्त सापडणार असून आता पाणीपुरवठा अल्पशा प्रमाणात होईल. नागरिकांनी सहकार्य करावे, असे प्रसिद्धीस पाठवून पाणीपुरवठा मंडळ सर्व जबाबदारी झटकून मोकळे होईल. पावसाळय़ात शहरात प्रचंड प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे हिडकल आणि राकसकोप जलायशे तुडुंब भरली. त्याचे वृत्त लगेच मंडळाने प्रसारमाध्यमांना पाठवून यावषी पाणी टंचाई निर्माण होणार नाही, असे स्पष्ट केले होते. अर्थात बेळगावकरांना एकूणच सर्वच खात्यांच्या ढिसाळ कारभाराची कल्पना असल्याने त्यांनी या वृत्तानंतर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.
नेहमीप्रमाणे अजून उन्हाळय़ाला सुरुवात झाली नाही, तोच पाणी टंचाईचे संकट सुरू झाले आहे. पाणी येणार नाही, पाणीपुरवठा अल्प प्रमाणात होईल, अशी कोणतीही पूर्वसूचनासुद्धा या दोन दिवसांत दिली गेली नाही. सर्वत्र बांधकामे सुरू झाल्याने विहिरींनाही पुरेसे पाणी नाही. परिणामी नववर्षाच्या सुरुवातीलाच बेळगावकरांच्या नशिबी पाण्यासाठी वणवण फिरणे अपरिहार्य ठरले.
दुर्दैवाने पाणीपुरवठा मंडळाकडे विचारणा करण्यासाठी संपर्क साधता फोन उचलला जात नाही किंवा उडवाउडवीची उत्तरे मिळतात. कोणत्या कारणासाठी पाणी टंचाई निर्माण झाली याचे कारण पुढे येत नाही. एकीकडे पाणी टंचाई असताना दुसरीकडे मात्र जलवाहिनीला गळती लागून असंख्य ठिकाणी पाणी वाया जात असते. ही विसंगती पाणी पुरवठा मंडळ कधी दूर करणार आहे? हे मंडळाला तरी माहिती आहे का? असा प्रश्न नागरिक करत आहेत.