शाळा-कॉलेजमधून तयारी पूर्ण
प्रतिनिधी /बेळगाव
राज्य सरकारच्या आदेशानुसार सोमवार दि. 23 पासून नववी ते बारावीपर्यंतचे ऑफलाईन क्लासेस सुरू होणार आहे. यासाठी शाळा-कॉलेज व्यवस्थापनाने सर्व ती खबरदारी घेतली आहे. प्रत्येक वर्गामध्ये सॅनिटायझरची फवारणी केली असून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक अंतर राखता येईल अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे.
कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे ऑफलाईन वर्ग बंद करून ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले होते. परंतु अनेक महिने शाळा बंद असल्याने पालक व विद्यार्थ्यांमधून शाळा सुरू करण्याची मागणी होत होती. ऑनलाईन वर्ग जरी सुरू असले तरी नेटवर्क, मोबाईल यांची सुविधा पुरेशी नसल्याने अनेक समस्या येत होत्या. त्यामुळे 23 पासून राज्यातील नववी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी राज्य सरकारने नियमावली देखील तयार केली आहे.
पहिल्या टप्प्यात नववी ते बारावी वर्ग सुरू केले जाणार आहे. त्यानंतर इतर वर्ग सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांनी मास्क, सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे. शाळा परिसरांची स्वच्छता, स्वच्छतागृह यांची स्वच्छता करण्याचे आदेश शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने पिण्याच्या पाण्याची बाटली घरामधूनच घेऊन यायची आहे. प्रत्येक वर्गात 20 विद्यार्थी बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी 10 ते दुपारी 1.30 या वेळेत वर्ग भरविले जाणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन वर्गात सहभागी होता येत नाही असे विद्यार्थी ऑनलाईन देखील शिक्षण घेऊ शकतात.