ऑनलाईन टीम / मुंबई :
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे चांगले काम करत आहेत. त्यांना टार्गेट करू नका, असा धमकीवजा फोन राजस्थानातून आल्याचा दावा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. या फोननंतर मलिकांनी पोलिसांत तक्रार दिली असून, त्यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी एनसीबीने केलेल्या कारवाईवर नवाब मलिक एनसीबीवर सातत्याने आरोप करत आहेत. या प्रकरणात समीर वानखेडे यांच्या कुटुंबावरही मलिकांकडून शाब्दिक हल्ला होत आहे. मलिकांनी म्हटले आहे की, ठराविक लोकांना खोटय़ा प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि दुबई आणि मालदीवमध्ये खंडणी वसुल करण्यात आली. मलिक यांनी समीर वानखडेंचे दुबईतील हॉटेलमधील फोटो काल (21 ऑक्टोबर 2021) ट्विट केले आहेत.
यावर वानखेडेंनी प्रतिक्रिया देत हा दावा फेटाळून लावला आहे. मी दुबईला गेलो नव्हतो. सुट्टीसाठी मी माझ्या मुलांसह मालदीवला गेलो होतो. त्यासाठी मी सक्षम प्राधिकरणाकडून योग्य परवानगी घेतली असल्याचे वानखेडेंनी म्हटले आहे.