नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँगेसला नवा अध्यक्ष द्या, अशी मागणी करणारे पत्र ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गाधींना पाठविल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेली काँगेसच्या कार्यकारिणीची बैठक कोणताही महत्वाचा निर्णय न होताच समाप्त झाली आहे. त्यामुळे काहीतरी खळबळजनक घडणार अशी अपेक्षा धरलेल्यांची चांगलीच निराशा झाली. येत्या सहा महिन्यात नवा काँगेस अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. तोपर्यंत सोनिया गांधींनीच अस्थायी अध्यक्षपदी रहावे, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे पक्षातील समस्यांवरील तोडगा पुढे ढकलण्यात काँगेसला यश आले, अशी खोचक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
बैठकीचा प्रारंभ वादळी झाला. या बैठकीत पत्रकारांना प्रवेश नव्हता. त्यामुळे वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तांवर विसंबून रहावे लागले. काही वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार सोनिया गांधींनी अस्थायी अध्यक्षपद सोडण्याची तयारी दर्शविली. कार्यकारिणीने नवा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करावी असे आवाहन त्यांनी केले. मात्र माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सोनिया गांधींनीच नेतृत्वपदी रहावे, असे आवाहन केले. त्याला अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला.
राहुल गांधी-सिब्बल वाद
माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात पत्र पाठविणाऱया नेत्यांवर कठोर टीका केली. या नेत्यांनी भाजपशी संधान बांधले आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केल्याचे सांगण्यात आले. यावर ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी ट्विटरवर राहुल गांधी यांच्यावर शरसंधान केले. गेल्या 30 वर्षांमध्ये आम्ही एकदाही भाजपचे कोणत्याही कारणास्तव समर्थन केले नाही. राजस्थानमध्ये आम्ही भाजपचे डावपेच हाणून पाडून सरकार वाचविले. असे असूनही आमच्यावर भाजपशी साटेलोटे केल्याचा आरोप कसा केला जाऊ शकतो? असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला. त्यामुळे काँगेसमधील नवे विरूद्ध जुने हा वाद पुन्हा उफाळल्याचे दिसून आले.
नंतर सारवासारव
तथापि, राहुल गांधी यांनी हे विधान केलेच नसल्याचे नंतर सिबल यांना व्यक्तीगत रित्या दूरध्वनी करून स्पष्ट केले असे सांगण्यात आले. त्यामुळे सिबल यांनी त्यांचा ट्विटर संदेश मागे घेतला. मात्र, तोपर्यंत तो अनेकांपर्यंत पोहचला होता. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनीही राहुल गांधी यांच्या विधानावर कठोर प्रतिक्रिया दिली. भाजपशी साटेलोटे असल्याचा आरोप सिद्ध झाल्यास काँगेस सोडण्याचा इशारा त्यांनी दिला. यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती.
पत्राच्या वेळेसंबंधी आक्षेप
अस्थायी अध्यक्ष सोनिया गांधी या रूग्णालयात उपचार घेत असताना हे पत्र त्यांना पाठविण्यात आल्यामुळे राहुल गांधी यांनी आपल्याच नेत्यांवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. पत्र पाठविण्यासाठी हीच वेळ का निवडली असा प्रश्न करून त्यांनी नेत्यांना स्पष्टीकरण देण्याचे आवाहन केले, असेही वृत्तसंस्थानी दिलेल्या माहितीत सांगण्यात आले आहे.
गांधी घराण्याच्या नेतृत्वाला समर्थन
काँग्रेसला नवा कृतीशील अध्यक्ष द्या अशी मागणी करणारे नेते अल्पमतात असल्याचे दिसून आले. बहुतेक अन्य नेत्यांनी काँगेसची सूत्रे गांधी घराण्याच्याच हाती असावीत असा सूर लावला. यात पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश होता. याशिवाय अनेक कार्यकारिणी सदस्यांनी ‘सोनिया गांधी नेतृत्व करू इच्छित नसतील, तर ते राहुल गांधींनी करावे, अशी सूचना केली.
पुन्हा ये रे माझ्या मागल्या…
सकाळी सुरू झालेली बैठक संध्याकाळी सात पर्यंत चालली होतीं. तरी एवढय़ा प्रदीर्घ चर्चेनंतरही पक्षातील नेतृत्वाची समस्या कायम असल्याचे दिसून आले असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले. शेवटी सोनिया गांधींनीच अस्थायी अध्यक्षपदी रहावे, काँगेसचे अखिल भारतीय अधिवेशन लवकरात लवकर बोलवावे, आणि या अधिवेशनात पक्षाध्यक्ष पदाचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात येऊन तो सर्व उपस्थितांनी संमत केला. त्यामुळे समस्या पुढे ढकलण्यात यश आले. मात्र ती सोडविण्यात यश आले नाही असेच चित्र दिसून आले.
गांधी घराण्याशिवाय पर्याय नाही
काँगेसला गांधी घराण्यातील नेतृत्वाशिवाय पर्याय नाही, असाही निष्कर्ष या घडामोडीतून काढता येऊ शकतो, अशी प्रतिक्रिया अनेक अभ्यासकांनी व्यक्त केली. काँगेसचे अधिवेशन जेव्हा होईल तेव्हा होईल, मात्र तोपर्यंत तरी सोनिया गांधीच अस्थायी नेतेपदी राहणार हे स्पष्ट झाले. येत्या सहा महिन्यांमध्ये अधिवेशन होईल असे सांगण्यात आले असले तरी या आश्वासनाकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता नाहीं, असेही तज्ञांचे मत असल्याचे दिसून आले.
पत्र पाठविणाऱयांचे काय होणार ?
23 नेत्यांनी पत्र पाठवून गांधी कुटुंबातील मान्यवर, काँगेसचे असंख्य कार्यकर्ते आणि बव्हंशी नेते यांचा रोष ओढवून घेतल्याचेही बैठकीत स्पष्ट झाल्याचे सांगण्यात आले. आता या नेत्यांवर कारवाई होणार का हा प्रश्नही उपस्थित झाला आहे. कारवाई झाली नाही तरी पक्षातील त्यांचे महत्व कमी होईल अशीही शक्यता अनेक राजकीय तज्ञांनी व्यक्त केली. एकंदर, काँगेसमधील गोंधळ कायम राहिल्याचाच निष्कर्ष अनेकांनी याबैठकीतून काढला आहे.