क्लोजडाऊन काळात अनेकांना फटका, सर्वसामान्य नागरिक रेशनपासून वंचित
प्रतिनिधी / बेळगाव
नवीन बीपीएल रेशनकार्डचे काम गेल्या दीड-दोन वर्षापासून ठप्प असल्याने गोर-गरीब जनतेला रेशनपासून वंचित रहावे लागत आहे. बीपीएल रेशनकार्ड मिळविण्यासाठी असंख्य नागरिकांनी अर्ज केले आहे. मात्र मागील वर्षभरापासून रेशनकार्डचे काम ठप्प असल्याने सर्वसामान्य नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अर्ज करूनदेखील अनेकांना रेशनकार्डे मिळाली नसल्याने लाभार्थी रेशनकार्डच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे रेशनकार्ड देण्याचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
नवीन रेशनकार्ड वितरणाच्या कामात मागील काही दिवसांपासून निवडणुकीचा अडथळा निर्माण होत आहे. विधानसभा, लोकसभा, ग्राम पंचायत व इतर निवडणुकामुळे मागील काही महिन्यांपासून रेशनकार्डचे काम थांबले आहे. मागील वर्षापासून गोर-गरीब जनता कोरोनाच्या संकटात सापडली आहे. त्यामुळे अनेकांचे खाण्यापिण्याविना हाल होत आहेत. तर दुसरीकडे आर्थिक दुर्बल असणाऱया घटकाला दिल्या जाणाऱया रेशनकार्डचे काम थांबल्याने अनेकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. रेशनकार्डचे काम स्थगित झाल्याने अनेकांना दर महिना मिळणाऱया रेशनपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. आगामी काळात ता. पं., जि. पं. व महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यास पुन्हा रेशनकार्डच्या कामाला स्थगिती मिळणार आहे. शिवाय रेशनकार्डअभावी इतर शासकीय कामात देखील अडचणी निर्माण होत आहेत. गतवषी देखील लॉकडाऊन काळात रेशनकार्डचे काम ठप्प होते. दरम्यानच्या काळात केंद्र सरकार व राज्य सरकारने अतिरिक्त धान्याचा पुरवठा केला होता. मात्र अनेकांकडे बीपीएल रेशनकार्ड असल्याने त्यांना रेशनपासून वंचित रहावे लागले होते. यंदा देखील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने क्लोजडाऊनचा नियम जारी करण्यात आला आहे. दरम्यान या संकट काळात सर्वसामान्यांचे हाल होऊ नये, याकरिता केंद्र सरकारच्या प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत मोफत धान्याचा पुरवठा केला जाणार आहे. शिवाय राज्य सरकारमार्फत देखील रेशनचा पुरवठा होणार आहे. मात्र अशा संकट काळातच नवीन बीपीएल रेशकार्डचे काम ठप्प झाल्याने अनेकांना फटका बसत आहे.