लाभार्थी सुविधांपासून वंचित : कामाला चालना देण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
मागील सहा महिन्यांपासून नवीन बीपीएल रेशनकार्ड वितरणाचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः रेशनपासून वंचित रहावे लागत आहे. बीपीएल कार्ड वितरणाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
मागील दोन वर्षांपासून नवीन बीपीएल आणि अंत्योदय रेशनकार्ड वितरणाचे काम विस्कळीत झाले आहे. त्यामुळे बीपीएल आणि अंत्योदय कार्डसाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः कार्डअभावी शासनाच्या योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. शिवाय मासिक रेशनपासूनदेखील दूर रहावे लागत आहे. त्यामुळे नवीन रेशनकार्ड कामाला चालना द्यावी, अशी मागणी होत आहे.
शासकीय कामे, वैद्यकीय सेवा आणि इतर कोणत्याही कामासाठी रेशनकार्ड बंधनकारक आहे. मात्र बऱयाच नागरिकांना रेशनकार्डअभावी गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून नवीन बीपीएल रेशनकार्ड मिळत नसल्याने समस्या निर्माण होत आहेत. मध्यंतरी काही लाभार्थ्यांना नवीन बीपीएल रेशनकार्डचे वितरण झाले. त्यानंतर ही प्रक्रिया तातडीने थांबविण्यात आली. त्यामुळे अर्ज करून वर्ष उलटले तरी अद्याप बहुतांशी लाभार्थ्यांना रेशनपासून वंचित रहावे लागले आहे. येत्या काळात पुन्हा निवडणुका लागल्यास रेशनकार्ड वितरणाचे काम लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे खात्याने तातडीने नवीन रेशनकार्ड वितरणाला सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे. मागील दोन वर्षांपासून केंद्र सरकारकडून मोफत अतिरिक्त धान्याचा पुरवठा केला जात आहे. केंद्र सरकारकडून 5 तर राज्य सरकारकडून 5 असे एकूण 10 किलो धान्य पुरवठा दरडोई वितरित केला जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना मुबलक तांदूळ उपलब्ध होत आहे. मात्र अर्ज करूनदेखील नवीन रेशनकार्ड मिळत नसल्याने लाभार्थ्यांना मोफत आणि अतिरिक्त धान्यापासून वंचित रहावे लागले आहे.
नवीन बीपीएल कार्डांसाठी 30 हजारांहून अधिक अर्ज
मागील सहा महिन्यांपासून नवीन बीपीएल रेशनकार्डचे काम थांबले आहे. जिल्हय़ातून नवीन बीपीएल कार्डासाठी 30 हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. दाखल झालेल्या अर्जांची छाननी सुरू आहे. लवकरच नवीन बीपीएल कार्ड वितरणाला सुरुवात होईल.
-श्रीशैल कंकणवाडी (सहसंचालक अन्न व नागरी पुरवठा खाते)