अंमलबजावणीत शाळा-शिक्षकांची जबाबदारी महत्त्वाची
प्रतिनिधी / बेळगाव
नवीन शैक्षणिक धोरण विविध बदलांचा अंतर्भाव करणारे असून त्यानुसार विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा विचार केंद्राने केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन त्यांच्या वजनाच्या 10 टक्क्याहून अधिक असणार नसल्याचे नवे स्कूल बॅग धोरण जाहीर केले आहे. यामुळे नवीन शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या दप्तराचा भार हलका असणार आहे. दप्तराच्या ओझ्याने विद्यार्थ्यांना होणाऱया शारीरिक त्रासाचा विचार करून पूर्व प्राथमिकपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे इयत्तानुरूप पाच किलोपर्यंत ठरवून देण्यात आले आहे. अंमलबजावणी करताना शाळा आणि शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे.
नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने सखोल विचार करून आखण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे नवीन शालेय दप्तरविषयक धोरण जाहीर करून कठोरपणे अंमलबजावणी करण्याचा आदेश बजाविण्यात आले आहेत. यामुळे शाळास्तरावर पाठय़पुस्तकापासून गृहपाठापर्यंतच्या वहय़ा-पुस्तकांवर वजनाची मर्यादा येणार आहे. याची तपासणी करण्यासाठी शाळास्तरावर वजनमापक असल्याने प्रभावी अंमलबजावणी करताना पाठय़क्रमाचे नियोजन, तासिकांचे नियोजन करावे लागणार आहे.
केंद्राकडून शालेय दप्तरविषयक धोरण जाहीर करून विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेचा विचार करण्यात आला असून हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. प्रभावी अंमलबजावणीसाठी शाळास्तरावर शिक्षकांकडून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत शिक्षकांमधून व्यक्त करण्यात आले.
तंत्रज्ञानाचा वापर-कृतीतून शिक्षणाकडे कल द्यावा लागणार
दप्तरविषयक धोरण स्वागतार्ह असून यामुळे शिक्षणप्रणालीत देखील बदल करावा लागणार आहे. पुस्तके आणि वहय़ा आणण्यावर मर्यादा येणार असून यामुळे तंत्रज्ञानाचा वापर आणि कृतीतून शिक्षण देण्याकडे कल द्यावा लागणार आहे. दप्तराचा भार हलका करण्यासाठी नो बॅग डे उपक्रम राबविला जातो. मात्र कायमस्वरुपीचा विचार करता हा निर्णय योग्यच आहे.
विद्यार्थ्यांचे शारीरिक त्रास कमी होण्यास मदत
दप्तराचा भार हलका झाल्यास विद्यार्थ्यांचे शारीरिक त्रास कमी होण्यास मदत होतील. मात्र यावर उपाय म्हणून शिक्षण पद्धतीत बदल अपेक्षित आहेत. याठिकाणी शिक्षकांच्या अध्यापन कौशल्याचा कस लागणार असून घटकनिहाय नियोजन, उपक्रमातून शिक्षण, कृतीतून शिक्षण याकडे भर द्यावे लागेल. यामुळे केवळ पाठय़पुस्तकाचा भार हलका करून उपयोग नाही तर त्यावर प्रभावीपणे उपाय सूचविणे गरजेचे असल्याचे मत शुभांगी पाटील शिरवलकर यांनी व्यक्त केले.
अंमलबजावणीत शाळांचा पुढाकार-नियोजन महत्त्वपूर्ण ठरणार
मुलांच्या शारीरिक क्षमतेचा विचार, आहार आणि पाठय़पुस्तकांचे वजन यांचा विचार करत नवीन धोरण स्वागतार्ह आहे. निर्णयाची अंमलबजावणी शाळास्तरावर प्रभावीपणे होणे आवश्यक आहे. त्यानुसार मासिक नियोजन, आठवडय़ांचे नियोजन, घटक नियोजन हे केवळ नावापुरते न करता प्रत्यक्षात दप्तराचे वजन हलके होण्यासाठी अवलंबावे लागणार आहे. यामुळे अंमलबजावणीत शाळांचा पुढाकार आणि नियोजन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
डिजिटल शिक्षणाचा नक्कीच फायदा होईल
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दप्तराच्या वजनाची मर्यादा 4182 ग्रॅम करण्यात आली आहे. हा निर्णय नक्कीच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. प्रवास आणि शारीरिक क्षमता विचारात घेता दप्तराचे वजन कमीच हवे. याची अंमलबजावणी करताना ऑनलाईन शिक्षण पद्धत, डिजिटल शिक्षणाचा नक्कीच फायदा होईल. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन शैक्षणिक धोरण दप्तराच्या वजनाचा भार हलका करण्यासाठी लाभदायक ठरेल, असे मत पी. के. पित्रे यांनी व्यक्त केले.