जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नसल्याने ऑल इज वेल
प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हा परिषदेत वरीष्ठ अधिकारी नसले की कर्मचारी चौखुर उधळतात. टेबलवर कोणीच नसते. बाहेर भागात गेलेत असे उत्तर दिले जाते. प्रत्यक्षात हालचाल रजिस्टरवर तशी नोंद नसते. वर्षाच्या पहिल्या दिवशी सातारा जिल्हा परिषदेत काही विभागात 12 वाजताच शुकशुकाट जाणवत होता. तशी महत्वाची कोणती बैठकही नव्हती. अशा प्रकारांना कधी लगाम लागणार अशी चर्चा सुरु आहे.
सातारा जिल्हा परिषदेत गतवर्षी कोरोनामुळे भरपूर सवलत दिली गेली. आता नवीन वर्षात नवीन पारदर्शक पद्धतीने कारभार सुरु व्हायला हवा. त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी तशी प्रत्येक विभागातील कर्मचाऱयांना शिस्त लावायला हवी. मात्र, काही विभाग हे एवढे बेरकी आहेत की त्यांच्याकडून काम कमी आणि बाहेर फिरतीला जास्त असेच चित्र दिसून येते. सातारा जिल्हा परिषदेत नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिल्याच दिवशी अनेक केबीनमध्ये शुकशुकाट जाणवत होता. दोन बांधकाम विभागापैकी एका बांधकाम विभागातले कर्मचारीच गायब झालेले दिसत होते. तर पशुसंवर्धन विभागातही तसाच प्रकार होता. दस्तुरखुद्द पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे हेच त्यांच्या केबीनला नव्हते. त्यामुळे कर्मचाऱयांकडूनही बिनधास्तपणा दिसत होता. समाजकल्याण विभागात नूतन समाजकल्याण अधिकारी सपना घोळवे याच नसल्याने त्याही विभागात चंगळच कर्मचाऱयांची दिसत होती.