ऑनलाईन टीम
टीम इंडियाने नवीन वर्षाची विजयी सुरुवात केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इंदूरच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या टी २० सामन्यात श्रीलंकेवर ७ गडी राखून मात केली. मालिकेतील पहिला सामना पावसात वाहून गेल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतासाठी विजय आवश्यक होता. आजच्या सामन्यात श्रीलंकेचे १४३ धावांचे आव्हान भारताने १७.३ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.
दरम्यान, नाणेफेक जिंकून भारताने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजीस आलेल्या श्रीलंकन खेळाडूंवर भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व राखले. त्यामुळे निर्धारित २० षटकांत लंकेने ९ बाद १४२ धावा केल्या. कुसल परेराने सर्वाधिक ३४ धावा केल्या. भारताच्या शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर नवदीप सैनी आणि कुलदीप यादवने प्रत्येकी २ गडी टिपले.
दुसऱ्यांदा फलंदाजीस उतरलेल्या भारताची सुरुवात चांगली झाली. १० व्या षटकात संघाची धावसंख्या ७१ असताना भारताला लोकेश राहुलच्या रुपाने पहिला झटका बसला. राहुल ४५ धावा करून परतला. त्यानंतर शिखर धवन (३०), श्रेयस अय्यर (३४) आणि विराट कोहलीच्या ३० धावांच्या बळावर भारताने १८ व्या षटकात विजयाला गवसणी घातली.