पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्राला संबोधताना एक नवी आशा आणि त्या आशेच्या अनेक दिशा दाखवल्या आहेत. त्यांनी ‘सब का प्रयास’ या नव्या विचारांची जोड दिली. मिझोरामच्या सैनिकी शाळेमध्ये मुलींना प्रशिक्षणाचा प्रयोग देशात राबवण्याचा निर्णय भविष्य घडवणार आहे. दारिद्रय़ाशी मुकाबला आणि एकविसाव्या शतकाच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने नवीन शैक्षणिक धोरण आखले आहे. शैक्षणिक धोरणात प्रादेशिक भाषांनाही महत्त्व देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मातृभाषेतच ज्ञानाने प्रगती होते. प्रतिभेला न्याय मिळतो हे पंतप्रधानांनी सांगतानाच खेळाच्या मैदानात भाषा अडथळा ठरली नाही हे आवर्जून सांगितले. आयुष्याच्या पूर्णत्वासाठी खेळ महत्त्वाचे असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसे झाल्यास क्रीडा क्षेत्राची प्रगती नजरेत भरेल. अमृत महोत्सवी वर्षापासून शतक महोत्सवापर्यंतच्या प्रगतीची एक दिशा त्यांनी या निमित्ताने दिली. देशातील गरजूंपर्यंत सोयीसुविधा 100 टक्के पोचवण्याचे लक्ष्य त्यांनी देशाला दिले. डिजिटल युगात असे लक्ष्य साध्य करणे मुश्कील राहिले नाही. दूर आदिवासी पाडय़ांमध्ये, डोंगर-दऱयांमधे राहणाऱया आणि विकासापासून वंचित राहिलेल्या घटकापर्यंत आरोग्य सुविधांच्या बरोबरीनेच चांगले अन्न, चांगले शिक्षण, चांगले प्रशिक्षण आणि नोकरीच्या चांगल्या संधीसुद्धा पोहोचू शकल्या तर या वर्गाच्या प्रगतीला कोणीही रोखू शकणार नाही. शहर आणि खेडय़ातील दरी दूर करणे गावागावापर्यंत ऑप्टिकल केबल जाळे पोहोचवणे, महिलांना स्वयंसहायता
ग्रुपच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय उभा करून त्यांचे उत्पादन इ कॉमर्सच्या प्लॅटफार्मद्वारे देशाच्या कानाकोपऱयात पोहोचवणे हा आदर्श व्यवस्थेचाच विचार म्हणावा लागेल. वाढत्या लोकसंख्येबरोबर शेतीचा होत चाललेला ऱहास यांचा विचार करून कृषी सुधारणांचा विचार पंतप्रधानांनी मांडला. किसान पेडिट कार्ड, सोलर एनर्जी, प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना आणि पिक विमा योजनेत सुधारणा करण्याबरोबरच उत्पादित माल गोदामात साठवण्याची व्यवस्था करण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला. गहू आणि तांदळाचे जगाला पुरेल असे उत्पादन करण्याचे धोरण गेली काही वर्षे देशात हेतूतः राबवले गेले आहे. आता यापुढे गरिबांना वाटण्यात येणाऱया तांदळामध्ये पोषणमूल्ये वाढवण्याचा आणि रेशनिंगपासून माध्यान्ह भोजनपर्यंतच्या योजनांमधून ते धान्य प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्याचा आराखडा पंतप्रधानांनी या निमित्ताने जाहीर केला हे फार महत्त्वाचे आहे. तेल, औषधी आणि सेंद्रिय शेतीवर सरकार भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ईशान्य भारतासह हिमालयाच्या पट्टय़ात सुधारणांचे वारे वाहतील, काश्मिरात लोकशाही प्रक्रिया गतिमान होईल, उर्वरित भारताशी त्यांना जोडता येईल आणि देशभर अक्षय ऊर्जेचे नवे पर्व सुरू होईल, 75 वंदे भारत एक्सप्रेस, नवे जलमार्ग जोडणे, सरकारी हस्तक्षेप कमी करून सुलभपणे सोयीसुविधा पोचवण्याचे आणि अनावश्यक कायद्यांच्या कटकटीतून लोकांना मुक्त करून सहज जीवन आणि सहज व्यवसाय करता येईल अशा पद्धतीने कायदे राबवण्याचा विचार त्यांनी मांडला. कॅशलेस व्यवहार आणि स्वच्छतेचा अंगीकार, प्लास्टिक मुक्ती, नदी प्रदूषण मुक्ती, समुद्र किनारे स्वच्छता यासह पर्यावरणवादी जीवनशैलीचा पंतप्रधानांच्या भाषणात उल्लेख आला आहे. देशाच्या प्रत्येक पंतप्रधानांनी देशाला एक दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. मोदींचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण ऐकताना यातील दारिद्रय़ निर्मूलन, भ्रष्टाचार निर्मूलन, विज्ञान-तंत्रज्ञान, जागतिक शांतता आणि भारतीय विचार आदी अनेक मुद्दे यापूर्वीच्या पंतप्रधानांनी आपल्या भाषणात घेतले होतेच. नेहरूंचे ऐतिहासिक पहिले भाषण, पहिली पंचवार्षिक योजना, धरणांची निर्मिती आणि राष्ट्राची उभारणी, मिश्र अर्थव्यवस्था अशा प्रगतीच्या पंखासह पहिली भरारी घेतली. पण नेहरूंच्या अंतिम काळात चीन युद्धाने शांतीदूताचे पंख कापले. लालबहादूर शास्त्री यांनी देशाला वास्तवाची जाणीव करून देत अन्नाच्याबाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी शेतकऱयांना आणि देश सबल करण्यासाठी जवानांना उद्युक्त केले. इंदिरा गांधी यांनी भारतातील दारिद्रय़ मुक्तीचे स्वप्न दाखवले. मात्र त्यांची अखेर देशाचे अनेक भाग अशांत असताना झाली. राजीव गांधी यांचे इंदिराजींच्या हत्येनंतर एक्केचाळीस आठवडय़ांनी झालेले लाल किल्ल्यावरील पहिले भाषण, त्याच पहाटे आसाम गण परिषदेशी झालेला करार आणि त्यापूर्वीचा पंजाब शांततेचा झालेला करार, नेहरूंच्या काळात खादी म्हणजे स्वदेशी होती. राजीव गांधींच्या काळात स्वदेशी संगणक आणि स्वदेशी उपग्रह हे परवलीचे शब्द बनले. व्ही. पी. सिंग यांचा काळ मंडल आयोगाची अंमलबजावणी आणि छोटय़ा जातींच्या राजकीय उद्धाराचा काळ बनला. पी. व्ही. नरसिंहराव यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला बदलून टाकले. ऐंशीच्या दशकात उदयास आलेला मध्यमवर्ग त्यांच्या काळात आर्थिकदृष्टय़ा संपन्न झाला, अटलबिहारी वाजपेयी यांनी जय जवान, जय किसान या घोषणेला जय विज्ञानची जोड दिली. देशाची प्रगती तेव्हा दृष्टीपथात येऊ लागली होती. मनमोहनसिंग यांच्या काळामध्ये ती पराकोटीला पोहोचली. मात्र भ्रष्टाचार, अव्यवस्था हे मुद्दे अगदी टोकाला पोहोचले आणि ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत नरेंद्र मोदी सत्तेवर आले. त्यांची राजवट आपण गेली सात वर्षे अनुभवत आहोत. या सात वर्षांच्या अनुभवाचे संचित म्हणजे त्यांचे यावेळचे भाषण होते. रोजगाराच्या बाबतीतील 100 लाख कोटीच्या सलग तिसऱया वषी झालेल्या घोषणेची टवाळी समाज माध्यमांवर सुरू असली तरी या संकटातही ते संधी शोधत आहेत हे विशेष. नवी दिशा आणि नवा विचार देण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला. मात्र प्रत्येकाच्या वाटेत काही ना काही काटे आलेच. देशाच्या नेतृत्वासमोर अशी आव्हाने उभी राहतच असतात. त्यावर मात करताना नेतृत्वाची दृष्टी दूरवरचे नियोजन करणारी असावी लागते. नरेंद्र मोदी यांनी पुढच्या पंचवीस वर्षाची दिशा दाखवली आहे. एक चांगला विचार म्हणून देशाला त्या दिशेने वाटचाल करावी लागेल.
Previous Articleअफगाणिस्तानमध्ये अनागोंदी
Next Article गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.