ऑनलाईन टीम / मुंबई :
नवी मुंबई विमातनतळ नामकरणावरुन सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. या नामकरणाच्या वादाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली भूमिका मांडली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नावच संयुक्तिक आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. नवी मुंबई विमानतळाच्या नामकरण मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राज ठाकरे यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला.
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. तर बाळासाहेबांचे नाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यातून संघर्ष होत असून पाठिंबा मागण्यासाठी माझ्याकडे प्रशांत ठाकूर आले होते, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आदरणीय आहे. दि बा पाटील हे देखील लोकनेते होते, त्याबाबतही दुमत नाही. परंतु हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्यामुळे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देणेच उचित आहे. शहराच्या बाहेर असले तरी ते मुंबई विमानतळ म्हणूनच ओळखले जाणार आहे. बाळासाहेब आज असते तर त्यांनी स्वत: सांगितले असते की शिवरायांचे नाव दिले पाहिजे. त्यामुळे महाराजांच्या नावावर चर्चा होऊ शकत नाही.
पुढे ते म्हणाले, शिवाजी महाराजाचे नाव आले तर संघर्षाचा विषय येईल असे मला वाटत नाही. माझ्या बोलण्यानंतर कोण कोण रस्त्यावर उतरतो ते बघू. वेळ आली तर या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन, असेही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे.