मुंबई \ ऑनलाईन टीम
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी आज सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात आला होता. याच मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे सिडको मुख्यालयाकडे येणाऱ्या चारही मार्गांची बुधवारपासून नाकाबंदी करण्यात आली होती. वाहतुकीचे मार्गही बदलले होते. मात्र आता हे मार्ग पूर्ववत झाल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी ट्विट करत दिली आहे.
नवी मुंबई पोलिसांनी ट्विट करत म्हटले आहे की, नवी मुंबई मध्ये करण्यात आलेल्या वाहतुकीसाठीचे सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. वाहतूक सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. तसेच २४ जून रोजी सकाळी ०८:०० पासून रात्री २०:०० पर्यंत नवी मुंबई मधून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहतुकीसाठी काही अधिसूचनाचे एक पत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे.
मुंबईहून पुणे-गोव्याकडे जाणाऱ्या वाहतुकीला ऐरोली, शिळफाटा मार्गे कळंबोलीला जावे लागत होते त्यानंतर ही वाहने पुणे- गोव्याकडे जाऊ शकत होती. मात्र आता हे निर्बंध उठवण्यात आले आहेत. तर पुण्याहून येणाऱ्या वाहनांना तळोजा येथील पुरुषार्थ पेट्रोलपंपापासून वळण घेऊन शिळफाटा मार्गे मुंबईत जावे लागणार होतं. पण थेट रस्ता आता सुरु झालेला आहे.वाशी टोलनाक्यावरून येणारी सर्व वाहने ही शिळफाटा मार्गानेच ये-जा सरू होती. पोलिसांनी शीव-पनवेल मार्गावरील वाहतूक उरण फाटा ते खारघरपर्यंत बंद केली होती. मात्र आता सर्व मार्गांवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.
नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावरुन वाद चांगलाच पेटला आहे. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी स्थानिक प्रकल्पग्रस्त नागरिकांची आहे तर शिवसेनेकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. या वादात उडी घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विमानतळा दि. बा. पाटील किंवा बाळासाहेब ठाकरे यांचं नाव न देता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात यावं, असं मत व्यक्त केलं. दरम्यान नवी मुंबईत दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी आयोजित आंदोलनात मनसे आमदार राजू पाटील सहभागी झाले होते .नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी आज सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात आला होता.