स्मार्ट सिटीतील प्रकार : नव्या दिव्यांसाठी खर्ची घातलेला निधी गेला कुठे? चौकशीची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून दुभाजक निर्माण करण्यात आले आहे. तसेच दुभाजकावर डेकोरेटिव्ह पथदीप बसविण्यात आले आहेत. मात्र नव्या डेकोरेटिव्ह खांबाला जुनेच दिवे बसविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नव्या दिव्यांसाठी खर्ची घालण्यात आलेला निधी कुणाच्या खिशात गेला? अशी विचारणा नागरिक करीत आहेत.
स्मार्ट सिटी बनविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने एक हजार कोटीचा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण, दुभाजकांची उभारणी आणि पथदीपांचे खांब बसविण्यात आले आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत डेकोरेटिव्ह दिवे बसविण्यात आले आहेत. याकरिता कोटय़वधी निधीची तरतूद करण्यात आली आहे. डेकोरेटिव्ह खांब आणि एलईडी दिवे बसविण्यात आले असून शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. तसेच धर्मवीर संभाजी चौक ते अशोक चौकापर्यंतच्या रस्त्यावर नवे पथदीप बसविण्यासाठी डेकोरेटिव्ह खांब बसविण्यात आले आहेत. मात्र या खांबावर जुनेच दिवे बसविण्यात आले असल्याचे निदर्शनास येत आहे.
धर्मवीर संभाजी चौकापासून ते अशोक चौकापर्यंतचे जुने दिवे काढून नव्या खांबांवर वायरद्वारे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे नव्या दिव्यांसाठी खर्ची घालण्यात आलेला निधी कुठे गेला? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. नव्या डेकोरेटिव्ह खांबांसह दिव्यांसाठी निधीची तरतूद करण्यात येते. मात्र शहरवासियांना फसविण्याचा प्रकार घडला असल्याच्या तक्रारी होत आहेत. वास्तविक पाहता नव्या डेकोरेटिव्ह खांबांसह नवीन दिवे बसविणे आवश्यक आहे. पण जुने दिवे बसविण्यात आल्याने ‘जुन्या बाटलीत नवी दारू’ असा प्रकार असल्याचा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. तर जुने पथदीप लावण्यासाठी वायरचा वापर करण्यात आला असून उन्हामध्ये वायर खराब होऊन दिवे पडण्याचा धोका आहे. त्यामुळे नव्याने बसविण्यात आलेल्या खांबांवर जुने दिवे बसविण्याचे प्रयोजन काय? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत असून नव्या दिव्यांसाठी खर्ची घालण्यात आलेला निधी कुणाच्या खिशात गेला? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. नवे खांब आणि जुने दिवे बसविण्यात आलेल्या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.