निंबवडे, किनरेवाडी, विहापूर येथे रूग्ण वाढले पाच जण कोरोनामुक्त १०४ रूग्ण बरे झाले
प्रतिनिधी / सांगली
मंगळवारी जिल्हय़ात नवीन चार रूग्ण वाढले. तर पाच जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनात बरे होणार्यांचे शतक पूर्ण झाले आहे. जिल्हय़ात एकूण रूग्णसंख्या १८२ झाली आहे. उपचारातील रूग्णसंख्या ७१ आहे. तर आजपर्यंत सात जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.
आटपाडी, शिराळा, कडेगावात रूग्ण वाढले
मंगळवारी घेण्यात आलेल्या चाचणी अहवालामध्ये आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथील ६५ वर्षाची महिला आणि ५८ वर्षाची व्यक्ती पॉझिटिव्ह आली आहे. तर शिराळा तालुक्यातील किनरेवाडी येथील ३५ वर्षाची व्यक्ती आणि कडेगाव तालुक्यातील विहापूर येथील ८२ वर्षाची व्यक्ती बाधित झाली आहे. या सर्वांवर मिरजेच्या कोरोना रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. या सर्वांचे मुंबई कनेक्शन आहे. तसेच यांच्या संपर्कातील हाय रिस्क व्यक्तींना संस्था क्वारंटाईन करण्यात आले आहे.
कोरोनात बरे होण्याचे शतक पूर्ण
जिल्हय़ात मंगळवारी आष्टा झोळंबी वसाहत येथील ३२ वर्षीय युवकांवर दहा दिवस उपचार केल्यानंतर त्याचा स्वॅब घेण्यात आला असता तो निगेटिव्ह आल्याने तो कोरोनामुक्त झाला आहे. ही व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने जिल्हय़ात आजपर्यंत कोरोना बरे होण्याचे शतक पूर्ण झाले आहे. त्याबरोबरच आटपाडी शेटफळे येथील ३९ वर्षीय व्यक्ती शिराळा तालुक्यातील मणदूर येथील ४५ वर्षीय व्यक्ती आणि ३८ वर्षीय महिला आणि रिळे येथील ४८ वर्षाची व्यक्ती असे एकूण पाच जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्हय़ात पहिली व्यक्ती सहा एप्रिलला कोरोनामुक्त झाली होती. तर नऊ जूनला १०० वी व्यक्ती कोरोनामुक्त झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या आता १०४ पोहचली आहे.
सहाही जणांची प्रकृती चिंताजनक
सध्या उपचारात असलेल्या सहा रूग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यामध्ये शिराळा तालुक्यातील खिरवडे येथील ५६ वर्षीय व्यक्ती, विटा-हनुमंतनगर येथील ३४ वर्षीय युवक या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथील ६० वर्षीय व्यक्ती, शिराळा तालुक्यातील मणदूर येथील ८१ वर्षीय आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील कदमवाडी येथील ५० वर्षाची महिला तसेच नांगोळे (मूळ गाव कडेबिसरी, ता.सांगोला.) येथील ४८ वर्षीय व्यक्ती यांची प्रकृती स्थिर आहे.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण १८२
बरे झालेले १०४
उपचारात ७१
मयत ०७