नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात मागील 24 तासांत म्हणजे मंगळवारी दिवसभरात 2 लाख 67 हजार 334 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दिलासा देणारी बाब म्हणजे याच कालावधीत देशात 3 लाख 89 हजार 851 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. असे असले तरी वाढत्या मृत्यूसंख्येने देशाची चिंता वाढवली आहे. गेल्या 24 तासांत आतापर्यंतची उच्चांकी मृत्यूंची नोंद झाली आहे. देशात मंगळवारी 4 हजार 529 रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या 2 लाख 83 हजार 248 वर पोहोचली आहे.
कोरोनाच्या दुसऱया लाटेदरम्यान गेल्या काही दिवसांपासून नवीन रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. पण मृतांचा आकडा मात्र चिंता वाढवत आहे. देशात गेल्या महिनाभरापासून दररोज 4 हजारांच्या आसपास कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. गेल्या 24 तासांतील मृत्यूची आकडेवारीही भयावह असून, देशात एका दिवसातील आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली आहे. देशात कोरोनाच्या दुसऱया लाटेने हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्र, दिल्लीत उदेक झाल्यानंतर गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये कोरोना परिस्थिती बिकट बनली आहे. तसेच तामिळनाडूमध्ये उच्चांकी बाधित सापडल्याने चिंता वाढली आहे. मात्र, देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुधारत असल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
कोरोना आणि कोरोनानंतर उद्भवणाऱया व्याधींमुळे देशात मोठय़ा संख्येने मृत्यू होत आहेत. देशात कोरोनामुळे प्राण गमवाव्या लागणाऱया रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्रात 679 मृत्यू झाले आहेत. त्यापाठोपाठ कर्नाटक 525, तामिळनाडू 364 या राज्यांचा क्रमांक आहे. महाराष्ट्रात 28 हजार 438 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर कर्नाटकात 30 हजार आणि तामिळनाडूत 33 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रात मंगळवारी 28 हजार 438 नवे कोरोना रुग्ण आढळले. जे सोमवारी सापडलेल्या नव्या रुग्णांच्या तुलनेने 1 हजार 822 इतके कमी होते. तर कोरोनामुळे राज्यात 679 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागानुसार, राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 54 लाख 33 हजार 506 झाली आहे. त्यापैकी 83 हजार 777 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.
तामिळनाडूत कोरोनाचे 33 हजार 059 नवे रुग्ण सापडले तर 364 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने याची माहिती दिली आहे. तामिळनाडू राज्यात एकूण 16 लाख 64 हजार 350 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांची संख्या 18 हजार 369 वर पोहोचली आहे. मंगळवारी 21 हजार 362 रुग्णांनी कोरोनाला मात दिली. या आकडय़ानुसार आतापर्यंत 14 लाख 03 हजार 052 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यातील 2 लाख 42 हजार 929 जणांवर उपचार चालू आहेत. पश्चिम बंगालमध्ये दिवसभरात कोविड-19 चे 19 हजार 428 नवीन रुग्ण सापडले तर यादरम्यान कोरोना व्हायरसमुळे 145 जणांचा मृत्यू झाला. तर कर्नाटकात मंगळवारी 30 हजार 309 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 525 जणांचा मृत्यू झाला. या 24 तासात राज्यात 58 हजार 395 जणांनी कोरोनावर मात केली आहे.