तिघांचा मृत्यू, मृतांची संख्या 285 वर : 41 जण कोरोनामुक्त
प्रतिनिधी / रत्नागिरी
बुधवारी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार जिह्यात 66 नवे कोरोनाबाधित आढळले असून कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7 हजार 835 झाली आहे. गेल्या 24 तासात जिह्यात आणखी 3 कोरोना बळींची वाढ नोंदवण्यात आली आहे. यामुळे जिह्याचा मृत्यूदर 3.63 वर पोहोचला आहे. बुधवारी 41 जणांना कोरोनातून बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत असले तरी वाढत्या मृत्यूदराची चिंता मात्र कायम आहे.
जिह्यामध्ये आणखी 3 कोरोना रुग्णांनी आपले प्राण गमावल्याची नोंद झाली आहे. यामध्ये खेड तालुक्यातील 77 वर्षीय महिला, चिपळूणमधील 56 वर्षीय पुरुष व 2 ऑक्टोबर रोजी मृत्यू झालेल्या रत्नागिरीतील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यामुळे मृतांचा एकूण आकडा 285 झाला आहे. सप्टेंबर महिन्यात जिह्यात तब्बल 130जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता तर या महिन्यात पहिल्या 7 दिवसातच हा आकडा 17 झाला आहे. नियंत्रणात न येणारा मृत्यूदर ही जिल्हय़ासमोरील समस्या आजही कायम आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णवाढीचे प्रमाण कमी होत आहे. बुधवारी 66 नव्या रुग्णांची भर पडली तर 41 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जनजीवन बरेचसे पूर्वपदावर येत असले तरीही काटेकोरपणे काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे आरोग्य विभागाचे आवाहन आहे.
खेडमध्ये आणखी 10 कोरोनाबाधित
मंगळवारी रात्री प्राप्त अहवालानुसार, खेडमध्ये आणखी 10 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. खेड शहरातील दोघांसह भरणेतील 7, कांदोशीतील एका रूग्णाचा समावेश आहे. नव्या रूग्णांमुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1278 इतकी झाली आहे.
जिल्हय़ातील कोरोनाची स्थिती:
एकूण संख्या-7835
नवे रूग्ण-66
नवे मृत्यू-03
एकूण मृत्यू-285