जेएनयू कुलगुरु जगदीश कुमारांचे आवाहन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जेएनयू मधील हिंसाचाराप्रकरणी कुलगुरु जगदीश कुमार यांचे विधान समोर आले आहे. चेहरे झाकलेल्या गुंडांकडून झालेला हल्ला दुर्देवी असून विद्यार्थ्यांनी आता नवी सुरुवात करावी. हिंसाचारात सामील लोकांच्या विरोधात कारवाई निश्चितच केली जाईल. जेएनयूची संस्कृती चर्चा आणि संवादातून तोडगा काढणारी आहे. हिंसाचार कुठल्याच गोष्टीचे उत्तर असू शकत नसल्याचे कुमार यांनी म्हटले आहे.
जेएनयूतील स्थिती सुरळीत करण्याचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. ठप्प पडलेली सर्व्हर यंत्रणा पुन्हा कार्यान्वित झाली आहे. विद्यार्थी आता नोंदणी करू शकतात, असे कुलगुरू कुमार यांनी सांगितले आहे.
हिंसाचार प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग तपास करत असल्याने अधिक बोलू शकत नाही. पोलिसांना सर्वप्रकारची मदत उपलब्ध केली जाणार आहे. सीसीटीव्ही फुटेज किंवा अन्य पुरावे पोलिसांना पुरविले जातील. तोडफोडीच्या कृत्यात सामील सर्वांवर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अभाविप-एनएसयुआयमध्ये संघर्ष
जेएनयूतील हिंसाचाराच्या विरोधात गुजरातमध्ये आयोजित निदर्शनांच्या दरम्यान अभाविप आणि एनएसयुआयच्या सदस्यांमध्ये संघर्ष झाला असून यात 10 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. एनएसयुआयकडून अहमदाबाद येथील अभाविपच्या कार्यालयाबाहेर निदर्शन आयोजित करण्यात आले होते. या निदर्शनावेळी संघर्ष झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत स्थिती नियंत्रणात आणली आहे.