विविध राज्यांमध्ये आंदोलन-निवेदने : दिल्लीत इंडिया गेटजवळ ट्रक्टरची जाळपोळ, सहा जण ताब्यात
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात नव्या कृषी कायद्यांवरून जनक्षोभ निर्माण झाला आहे. संतप्त शेतकरी सरकारच्या निर्णयावरून आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. देशभरात विविध राज्यात शेतकऱयांनी केंद्र सरकारसमोर मागण्या ठेवत आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आंदोलन छेडत आहेत. दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिमी भागात शेतकरी आंदोलनाचा परिणाम मोठय़ा प्रमाणावर पाहायला मिळत आहे.
दिल्लीत राजपथावर सोमवारीही आंदोलनाचे तीव्र पडसाद पाहायला मिळाले. काही अज्ञातांनी एक ट्रक्टर इंडिया गेटच्या जवळ आणला. तिथेच आंदोलन केले आणि नंतर ट्रक्टर पेटवून दिला आहे. दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान ट्रक्टर पेटवणाऱयांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर सायंकाळी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले होते.
पंजाब जाणार सर्वोच्च न्यायालयात
संसदेत मंजूर करण्यात आलेल्या नव्या कृषी कायद्यांना पंजाबमध्ये तीव्र विरोध होत आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवे कायदे शेतकऱयांच्यादृष्टीने घातक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. संसदेत मंजूर झालेल्या विधेयकांवर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर त्याचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे. या नव्या कायद्यांविरोधात अमरिंदर सिंग यांनी सोमवारपासून ‘बैठक आंदोलन’ सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनाला शेकडो शेतकऱयांचा पाठिंबा असल्याचे चित्र सोमवारी दिसून येत होते.
राजस्थानमध्येही विरोध
नव्या कृषी कायद्यांना राजस्थानमध्येही विरोध सुरू आहे. राजस्थान काँग्रेसच्या वतीने सोमवारी राज्यपालांना त्यासंबंधी निवेदन सादर करून नवे कायदे मागे घेण्याची मागणी करण्यात आली. प्रदेश काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह, मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि अन्य नेत्यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांना मागण्यांसंबंधीचे निवेदन सोमवारी सादर केले. राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांप्रमाणेच अन्य राज्यांमध्येही काँग्रेसच्यावतीने राज्यपालांना निवेदन सादर करून नव्या कृषीविषयक कायद्याला विरोध दर्शविण्यात आला.