चोवीस तासांमध्ये 45 हजार रूग्ण, जुलैपासूनचा नीचांक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना विषाणूच्या संसर्गाने धास्तावलेल्या देशासाठी कालचा मंगळवारचा दिवस मोठाच दिलासादायक ठरला आहे. सोमवार संध्याकाळ ते मंगळवार संध्याकाळ या चोवीस तासांमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत 44 हजार 747 ने भर पडली असून 69 हजार 237 रूग्ण बरे झाले. प्रतिदिन रूग्णसंख्येचा हा जुलैपासूनचा नीचांक आहे. कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्याची याच 24 तासांमध्ये 586 इतकी असून तोही गेल्या तीन महिन्यांमधील एक नीचांक आहे.
जुलैपासून प्रतिदिन रूग्णसंख्येत किमान 50 हजारांची भर पडत होती. सप्टेंबरच्या मध्यात तर ही संख्या 1 लाखाच्या आसपास पोहचली होती. तथापि, गेल्या तीन आठवडय़ांपासून नव्या रूग्णसंख्येत लक्षणीय घट होत असून उपचाराधीन रूग्णांची संख्याही दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. मंगळवारी ही संख्या साडेसात लाखांच्याही खाली जाऊन 7 लाख 47 हजार 478 झाली.
शास्त्रज्ञांचे अनुमान
फेब्रुवारीपर्यंत कोरोना आटोक्यात येईल, असे शुभ अनुमान शास्त्रज्ञांच्या एका दलाने संशोधनाअंती व्यक्त केले होते. त्या दिशेने आता कोरोनाची वाटचाल सुरू झाल्याचे दिसून येते. या शास्त्रज्ञांनी जागतिक संशोधकांनी तयार केलेल्या प्रारूपानुसार हे अनुमान व्यक्त केले होते. मात्र, कोरोना पूर्ण हटेपर्यंत लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असेही या शास्त्रज्ञांनी अहवालात स्पष्ट केले आहे.
तीन आठवडय़ांमध्ये परिवर्तन
कोरोनाच्या भयंकर परिस्थितीत गेल्या तीन ते चार आठवडय़ांमध्ये मोठे परिवर्तन पहावयास मिळाले आहे. कोरोनाचा बहराचा काळ आता ओसरण्याच्या मार्गावर असून तसे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. हिंवाळय़ामध्ये अतिथंडीच्या प्रदेशांमध्ये काही प्रमाणात रूग्णसंख्येत वाढ होऊ शकते. तथापि, ती अनियंत्रित असणार नाही, असेही अनुमान काढण्यात आले आहे.
उपचाराधीन रूग्ण कमी होणार
फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत देशभरात उपचाराधीन रूग्णांची संख्या 40 हजारांपर्यंत खाली येईल, असे अनुमान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केले आहे. ते खरे ठरल्यास त्यासारखे समाधानकारक काही नसेल अशी प्रतिक्रिया तज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या परतीच्या प्रवासाची लोक आतुरतेने वाट पहात आहेत.