म्हैसूर विद्यापीठाच्या 100 वा पदवीदान समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी / बेंगळूर
देशातील शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याच्या उद्देशाने नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण क्रियान्वित करण्यात आले आहे. प्री नर्सरीपासून ते पीएचडीपर्यंतच्या शिक्षणात मुलभूत सुधारणा करण्यासाठी नवे नियम समाविष्ट करण्यात आले आहेत. शिक्षण क्षेत्रातील संशोधन, कौशल्य विकास, ज्ञानार्जनाची क्षमता वाढवून नवनिर्मितीसाठी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. म्हैसूर विद्यापीठाच्या 100 व्या पदवीदान समारंभाचे नवी दिल्ली येथून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
देशात 34 वर्षांनंतर राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षणामध्ये पारदर्शित्व आणण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय मंडळ स्थापन करण्यात आले आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात नव्या शिक्षण संस्था स्थापन करणे, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पूरक वातावरणनिर्मिती करणे ही देखील उद्दिष्टय़े नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाद्वारे समाविष्ट आहेत. नव्या भारताच्या निर्मितीसाठी युवकांची भूमिका पूर्वीपेक्षा आता अधिक आहे. कोरोना संकटकाळात देशात नवोद्योग स्थापनेसाठी युवकांनी पुढे येणे कौतुकास्पद आहे, असे उद्गारही पंतप्रधानांनी काढले.
सध्याचे दशक युवकांचे आहे. युवकांनी स्वावलंबी बनून इतरांनाही स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न करावेत. धारवाडमध्ये आयआयआयटी स्थापन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कर्नाटकातील युवकांना उच्च शिक्षणासाठी अधिक अनुकूल वातावरण निर्माण होणार आहे, असे ते म्हणाले.
ज्ञानाचा उपयोग जनसेवेसाठीही करावा
देशातील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक असलेले म्हैसूर विद्यापीठ अस्तित्वात येण्यास म्हैसूरचे तत्कालिन राजवंशज नाल्वडी कृष्णराज वडेयर आणि भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या यांची दूरदृष्टी कारणीभूत आहे. राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात म्हैसूर विद्यापीठाचे योगदान असाधारण आहे. पदवी प्राप्त केलेल्या या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी समाजासाठी कार्य करण्याचा संकल्प करावा. केवळ पदवी घेऊन उपयोग नाही. तर मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग जनसेवेसाठीही करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पदवीदान समारंभप्रसंगी कुलपती तथा राज्यपाल वजुभाई वाला, उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथ नारायण, कुलगुरु प्रा. हेमंतकुमार तसेच विद्यापीठातील इतर प्राध्यापक उपस्थित होते.
‘हे दशक भारताचे’…
भारताने आर्थिक सुधारणा घडवून आणण्याचे काम झपाटय़ाने हाती घेतले आहे. अनेक सुधारणा गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे दशक भारताचे ठरणार आहे, असा आत्मविश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. आर्थिक सुधारणांमुळे मोठय़ा प्रमाणावर विदेशी गुंतवणूक देशाकडे आकर्षित होत आहे. तसेच आत्मनिर्भरतेच्या धोरणामुळे देशी उद्योजकांना आणि तंत्रज्ञान संशोधकांना मोठे प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.