प्रतिनिधी / कोल्हापूर
लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या 48 वर्षांच्या जीवन प्रवासात शिक्षण, शेती, मल्लविद्या, शिकार, उद्योग, व्यवसाय आणि व्यापाराचा व्यापक विचार केला. दुरदृष्टी कृतीत उतरवून जनसामान्यांचे कल्याण केले. महानगरपालिकेने अशा द्रष्टय़ा राजाचे समाधी स्मारक उभारून उल्लेखनीय काम केले आहे. या स्मारकातून नव्या पिढीला अधुनिकतेची, विकासाची आणि समतेची प्रेरणा मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला.
नर्सरी बागेतील लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकाच्या लोकर्पण सोहळा शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, महापौर ऍड.सुरमंजिरी लाटकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, आमदार चंदकांत जाधव, प्रकाश आवाडे, राजेश पाटील, खासदार धैर्यशील माने, ऋतुराज पाटील, पी.एन.पाटील, राजू आवळे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जि.प.सीईओ अमन मित्तल, महापौर मल्लिनाथ कलशेट्टी, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.सुहास वारके, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, माजी आमदार के.पी.पाटील आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, 1974 साली कोल्हापूरमध्ये आयोजित केलेल्या राजर्षी शाहूंच्या जन्मशताब्दी कार्यक्रमास पहिल्यांदा उपस्थित राहिलो. तेंव्हापासून आजतागायत कोल्हापूरातच नव्हे तर राज्यात अथवा देशात लोकराजाचा कोणताही कार्यक्रम असला तरी तेथे आवर्जून उपस्थित राहतो. संसदेच्या प्रांगणात देशाच्या जडणघडणीमध्ये योगदान देणाऱया थोर महापुरुषांचे पुतळे आहेत. या पुतळ्यांच्या रांगेत राजर्षी शाहूंचा पुतळा उभारावा यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे आता लोकराजाचे दर्शन घेऊन आम्ही संसदेत जातो. देशात अनेक राजे आणि संस्थाने होऊन गेले, पण समाजहितासाठी संपूर्ण जनमाणसांना संघटीत करून शाहूंनी राज्य प्रस्थापित केले.
पवार म्हणाले, रयतेचे राजे शिवछत्रपतींनी ही सत्ता आपली नसून रयतेची आहे. समाजातील शोषित,पिडीतांची आहे. रयतेचे राज्य म्हणून कारभार केला. तर राजर्षी शाहूंनी दिनदुबळ्या जनतेसाठी काम केले. दिशा देणारे नेतृत्व होते. त्यांचे काम हे कोल्हापूर जिल्हा, अथवा राज्यापुरते मर्यादित नसून ते देशव्यापी आहे. दत्तकविधानानंतर पहिल्याच दिवसापासून त्यांनी समाजहिताचे अनेक निर्णय घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या मनात तळागाळातील शेवटच्या माणसाबद्दल कणव होती. राज्यात दौऱयावर जाताना जनतेची आपुलकीने विचारपूस करत होते. प्रत्येक व्यक्ती हा प्रजेतला महत्वाचा घटक असल्याचे मानून काम केले. शिक्षणाचा प्रसार करून जात-धर्माचे जोखंड तोडण्याचा प्रयत्न केला. समाजातील उपेक्षीत वर्गाला न्याय दिला.